Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:11 IST2025-10-31T17:10:34+5:302025-10-31T17:11:50+5:30
Mumbai Children Hostage Case: काल पवईमधील एका स्टुडिओमध्ये १७ मुलांना आलीस ठेवल्याची घटना समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी एन्काऊंटर केला, यामध्ये रोहित आर्या याचा मृत्यू झाला.

Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
Rohit Arya Encounter : काल मुंबईतील पवईच्या स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवल्याची घटना समोर आली होती. या घटनेत ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या याचा मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर केला, यामध्ये आर्या याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता आरोप सुरू झाले आहेत. या प्रकरणात एका वृद्ध महिलेने महत्त्वाची भूमिका बजावली. ती तिच्या नातवासोबत ऑडिशनसाठी आली होती, पोलिस आणि अग्निशमन विभाग बाहेर मुलांना सोडवण्याची तयारी करत होते. आत, मंगला पाटणकर ओलीस ठेवलेल्या मुलांचे रक्षण करत होत्या. काच लागल्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती, सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत त्यांनी रुग्णालयातून माहिती दिली. रोहित आर्या काही मुलांना त्यांच्यासोबत सोडून गेला आणि उर्वरित मुलांना वरच्या मजल्यावर घेऊन गेला. थोड्या वेळाने तो खाली आला आणि त्यांना इतरांसोबत येण्यास सांगितले. वरती आल्यानंतर मुलांना काहीच शिकवत नसल्याचे आजींच्या लक्षात आले. खिडक्या ब्लॅकआउट पडद्यांनी झाकलेल्या होत्या. हे सगळे पाहून काहीतरी वेगळे असल्याचा संशय आल्याचा आजींनी सांगितले. त्याने चार मुलांना त्यांच्या पालकांना फोन करून प्रत्येकी १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. आर्या त्यांना ताबडतोब ४ कोटी रुपयांची मागणी करण्याचा आग्रह करत राहिला आणि इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा दावा करत ओलिसांना धमकावत राहिल्याचे आजींनी सांगितले.
मुलांच्या कुटुंबियांनी फोन केले
मंगला पाटणकर म्हणाल्या की, आर्या संपूर्ण वेळ चांगले वागत होता, पण त्याचबरोबर तो खूप नाटकही करत होता. त्याने दिवाळीचे फटाके फोडले आणि आम्हाला बाहेर पडू नये म्हणून बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले. "मला ओलिसांच्या संकटाबद्दल फोन आला होता, म्हणून मी त्यांना सांगितले की मुले माझ्यासोबत सुरक्षित आहेत." त्याना संशय आला की संस्थेतील दुसरा कर्मचारी या योजनेत सहभागी आहे कारण तो घाबरलेला दिसत नव्हता. यावेळी त्या आजींनी मुलींची विशेष काळजी घेतली.