कितीही काहीही करा, सुधारणार नाहीच; रेल्वेचा विनातिकीट प्रवाशांकडून २२९ कोटींहून अधिक दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 11:42 IST2026-03-15T11:41:53+5:302026-03-15T11:42:29+5:30
Indian Railway News: विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या १० टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

कितीही काहीही करा, सुधारणार नाहीच; रेल्वेचा विनातिकीट प्रवाशांकडून २२९ कोटींहून अधिक दंड वसूल
Indian Railway News: गेल्या अनेक महिन्यांपासून विनातिकीट किंवा बेकायदा पद्धतीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून भारतीय रेल्वेने कडक धोरण अवलंबले आहे. अनेक तपास मोहिमांच्या माध्यमातून अशा प्रवाशांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यातून वसूल केलेल्या दंडाची रक्कम नवीन विक्रम प्रस्थापित करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दंडात्मक कारवाई, तपास मोहिमा, आवाहन करूनही विनातिकीट रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही फरक पडताना दिसत नाही. उलट दिवसेंदिवस नियम मोडणाऱ्यांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे.
विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी कोकण रेल्वेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तिकीटतपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. गेल्या महिन्यात नियमित तपासणीसह एकूण ८७३ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबविल्या. यावेही ४१,५२२ विनातिकीट किंवा अनियमित प्रवासी आढळून आले आहे. त्यांच्याकडून रेल्वे भाडे व दंड मिळून २ कोटी ४१ लाख रुपये वसूल केले आहेत. तर मध्य रेल्वेही व्यापक तपास मोहीम राबवत असून, यातून कोट्यवधींचा दंड वसूल करण्यात आला आहे.
विनातिकीट प्रवाशांची संख्या १० टक्क्यांनी वाढली
मध्य रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी वारंवार तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेवरील ३८ लाख प्रकरणांमधून २२७ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात विनातिकीट प्रवाशांची संख्या १० टक्क्यांनी वाढली आहे. ही कार्यवाही सर्व विभागांमध्ये मेल/एक्स्प्रेस, विशेष रेल्वेगाड्या तसेच मुंबई व पुणे विभागातील उपनगरी गाड्यांमध्ये केली जाते. मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी फेब्रुवारी २०२६ महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या ३.६५ लाख प्रवाशांना पकडले. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून २३.२७ कोटी रुपये इतकी दंड वसूल करण्यात आला.
दरम्यान, कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये फेब्रुवारी २०२६ पर्यंत मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कालावधीत १०,३६८ विशेष तिकीट तपासणी मोहिमा घेतल्या. मोहिमांमध्ये ४ लाख ५४ हजार ८४९ विनातिकीट किंवा अनियमित प्रवासी सापडले. रेल्वे भाडे व दंडाच्या स्वरूपात २५ कोटी २१ लाख रुपये वसूल केले आहेत. येत्या उत्सव काळाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर तिकीट तपासणी मोहीम आणखी कडक करण्यात येणार आहे.