Join us  

CoronaVirus News: ATKT असलेल्या विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय घेणार?; आशिष शेलार यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 2:38 PM

 मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना काल पत्र लिहून आशिष शेलार यांनी पदवी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले होते तर आज त्यांनी राज्यपालांची भेट घेतली.

मुंबई: सरासरी गुण देण्याचा निर्णय सर्वसमावेशक विचार करुन झाला का? तरुणांच्या माथी "जळीत बीए" प्रमाणे "कोरोना ग्रॅज्युएट" बिरुदावली लागणार का? पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या मनात अशा भयगंड निर्माण केलेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधीत भाजपाचे नेते आणि माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आज राजभवनवर जाऊन कुलपती म्हणून राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना काल पत्र लिहून आशिष शेलार यांनी पदवी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले होते तर आज त्यांनी राज्यपालांची भेट घेतली.

शासनाने पदवी अंतीम वर्षांची परिक्षा न घेता सरासरी गुण देण्याचा व गुणसुधार कार्यक्रमात ऐच्छिक जाण्याचा तीन महिन्या नंतर त्यांची परिक्षा घेण्याचा जो निर्णय घेतला तो सर्वसमावेशक विचार करुन घेतला का असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. तसेच राज्यातील सर्व विद्यापीठ मिळून ATKT असलेल्या 40% विद्यार्थ्यांचे काय, त्यांना प्रथम व व्दितीय वर्षात ATKT असल्याने त्यांना नापास करणार का? असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडले असल्याचे आशिष शेलारांनी सांगितले.

पुर्वी एका विद्यापीठाच्या उत्तर पत्रीका असलेला खोलीला आग लागल्याने त्यावर्षीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यांच्या शैक्षणिक करिअरला "जळीत बीए" असे बिरुदावली लागली. तशी दुर्दैवाने बिरुदावली आता "कोरोना ग्रॅज्युएट" म्हणून लागणार का? विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांचा विचार होणे आवश्यक आहे यासाठी आज आपण राज्यपालांची भेट घेतल्याचे आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले. 

पदवी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांना विविध प्रश्नांनी घेरले असून ते आपल्या शैक्षणिक करिअरबाबत भयभीत आहेत. त्यामुळे मा.कुलपतींनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची योग्यवेळी दखल घेऊन त्यांना चिंतामुक्त करावे, अशी विनंती करण्यासाठी आपण मा. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना भेटलो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान काल मुख्यमंत्री आणि आज राज्यपालांना दिलेल्या निवेदनात आमदार अँड आशिष शेलार यांनी उपस्थित केलेले प्रश्न खालील प्रमाणे आहेत.

आशिष शेलार यांनी उपस्थित केलेले प्रश्न

  • राज्यातील विद्यापीठांमध्ये ATKT असलेल्या विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय घेणार? ATKT चे विद्यार्थी हे नापास गृहीत धरले जातील. त्यामुळे त्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे याचा विचार केला आहे का? राज्यात सर्व विद्यापीठ मिळून 40 टक्के विद्यार्थी हे ATKT असलेले आहेत.
  • अनेक विद्यापीठांमध्ये पदवीचे अंतिम वर्ष हे स्पेशलायझेशनचे असते. पहिल्या व दुस-या वर्षामध्ये सर्वच विषयांचा समावेश असतो. त्यामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याच्या आवडीच्या विषयांतील गुणांपेक्षा पहिल्या व दुस-या वर्षातील गुणांवरच पदवी दिली जाईल. हे योग्य होईल का?
  • जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये इंजिनीयरिंग, फार्मसी व अॅ्ग्रीकल्चर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणा-या प्रवेश परीक्षांबाबत धोरण काय? याही प्रवेश परीक्षा रद्द करणार काय? (लॉ, बी.एड. प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा घेतल्या जातात.) 
  • हा निर्णय पोस्ट ग्रॅज्युएशनला शिकणा-या विद्यार्थ्यांना सुध्दा लागू आहे का?
  • अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत कुलगुरुंच्या समितीने परीक्षा घेणे शक्य नाही असे म्हटले होते काय?
  • काही विद्यापीठांमध्ये पहिल्या व दुस-या वर्षांच्या परीक्षा महाविद्यालयस्तरावर घेतल्या जातात. अंतिम वर्षांच्या दोन सेमिस्टरच्या परीक्षा हे विद्यापीठ घेते. त्यामुळे महाविद्यालयीन परीक्षेच्या गुणांवरच कदाचित विद्यार्थ्याला पदवी मिळेल.
  • पुढील शैक्षणिक वर्ष पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएट) अभ्यासक्रम कधी सुरु होणार?
  • जर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये गुण सुधारणेसाठी (Class Improvement) परीक्षा देणार असतील तर या गुण सुधारणेचा विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी फायदा होणार का? देशातील अन्य विद्यापीठांचे पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम तोपर्यंत सुरु झाले असतील तर या विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे.
  • जर Class Improvement च्या गुणांचा फायदा विद्यार्थ्यांना द्यायचा असेल तर शैक्षणिक वर्ष डिसेंबर किंवा जानेवारीत सुरु करणार काय?
  • मागील वर्षाच्या सरासरी गुणांवर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीला विद्यापीठ अनुदान आयोग मान्यता देणार काय?
  • राज्याबाहेरील विद्यापीठांमध्ये तसेच परदेशातील विद्यापीठांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्या संधी नाकारल्या जाणार नाहीत ना? याचा विचार केला आहे का?
  • बार कौन्सिल ऑफ इंडिया, फार्मसी कौन्सिल, कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरसारख्या पार्लमेंट अॅक्टने स्थापन झालेल्या शिखर संस्था विद्यार्थ्यांना व्यवसायासाठी लागणारा परवाना देतील काय?
  • बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच नामांकित फर्ममध्ये तसेच समाजामध्ये सरासरी गुणांमुळे विद्यार्थ्यांकडे वेगळ्या नजरेने (कोरोना पदवी) पाहिले जाईल काय?
  • विद्यापीठाच्या स्वायत्ततेमध्ये हा सरकारी हस्तक्षेप नाही काय? 
  • विद्यापीठातील सर्व शैक्षणिक घटकांनी एकत्रित विचार करुन निर्णय घेणे योग्य ठरले नसते काय?
टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसविद्यार्थीआशीष शेलारउद्धव ठाकरेभाजपामहाराष्ट्र सरकार