मराठी मनोरंजनविश्वात एका हॉरर वेबसीरिजची चर्चा आहे. 'अंधार माया' ही वेबसीरिज भेटीला आली आहे. किशोर कदम, शुभंकर तावडे, स्वप्नाली पाटील आणि ऋतुजा बागवे अशी सीरिजमध्ये स्टारकास्ट आहे. नुकतंच एका मुलाखतीत अभिनेत्री ऋतुजा बागवेने खऱ्या आयुष्यात आलेला भीतीदायक अनुभव सांगितला.
ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) मराठीतील गुणी अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाचं कायम कौतुक होतं. भूतप्रेतवर विश्वास आहे का किंवा असा काही विचित्र अनुभव आला आहे का यावर उत्तर देताना नुकतंच ऋतुजाने एक घटना सांगितली. 'तारांगण'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली," या गोष्टी मी मानत नाही. पण मी मिलिटरी शाळेत असतानाचा एक अनुभव आहे. शाळेजवळ पिंपळाचं झाड होतं. त्याला दर अमावस्येला नारळ द्यायचा अशी प्रथा होती. एका अमावस्येला नारळ चुकला. तेव्हा आमच्या मेसमध्ये अचानक किडे, मुंग्या असं सगळं यायला लागलं. काय होतंय कळत नव्हतं, काही केल्या जात नव्हतं. शेवटी आमचे हेड म्हणाले की, 'अरे आज अमावस्या आहे नारळ दिलाय का'? मग कळालं की अरे नाही दिलाय. मग जाऊन नारळ दिला आणि नंतर एक ते दीड तासात सगळं गेलं. पण हे असं पहिल्यांदाच मी अनुभवलं. माझा विश्वासच बसत नव्हता. मी खूप घाबरले होते."
सीरिजच्या प्रमोशननिमित्ताने सर्वांनीच आपापल्या आयुष्यातील असे किस्से सांगितले. किशोर कदम म्हणाले, "लहानपणी गावात राहत असताना आमच्या घराच्या बाहेर विहीर होती. ९ घरांची ती वाडी होती. सगळे त्या विहीरीतील पाण्यात पोहायचे. पण माझ्या आईला त्या पाण्याची भीती वाटायची म्हणून तिने मला कधीच त्यात पोहू दिलं नाही. एकदा सकाळी मी झोपेतून उठलो तर कुजबूज ऐकू येत होती. विहिरीच्या बाजूला पिण्याच्या पाण्याचा भरण्याचा नळ होता. एरवी तिथे एकावेळी ४-५ बायका जायच्या पण त्या दिवशी एकेकटीच बाई जात होती. मी लहान होतो मला कळलं नाही. नंतर लक्षात आलं की आदल्या रात्री विहीरीत कोणीतरी जीव दिलाय आणि त्याचं प्रेत वर तरंगत होतं. मला ते जाऊन बघावं अशी मला उत्सुकता होती. पण आईने मला सोडलं नाही. नंतर त्याला वर काढताना मी पाहिलं. एरवी आम्ही विहिरीजवळ खेळायचो. पण त्या रात्री मला त्या विहीरीकडे जावंसंच वाटलं नाही. मी पुढचे काही दिवस गेलो नाही कारण ती भीती मनात होती."