Panchayat 4: 'पंचायत' सीरिजचा चौथा सीझन आला आहे. या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. ही फक्त सीरिज नाही तर चाहत्यांसाठी एक इमोशन आहे. एका गावाची साधी सरळ, हलकी फुलकी गोष्ट आणि कलाकारांचा दमदार अभिनय सीरिजला खास बनवतं. मात्र सीरिजच्या चौथ्या सीझनकडून जी अपेक्षा होती त्यावर सीरिज खरी उतरलेली नाही. अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. विशेषत: शेवटचा एपिसोड लोकांना आवडला नाही. यामुळे गेल्या तीन सीझनच्या तुलनेत या सीझनच्या शेवटच्या एपिसोडला सर्वात वाईट रेटिंग मिळाली आहे.
'पंचायत ४'च्या शेवटच्या एपिसोडवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयएमडीबी नुसार, 'पंचायत'च्या सीझन १ च्या शेवटच्या एपिसोडला ८.८ रेटिंग होती. दुसऱ्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडला ९.६ रेटिंह मिळाली होती. तर तिसऱ्या सीझनच्या शेवटच्या 'हमला' या एपिसोडला ९ रेटिंग मिळाली. आता चौथ्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडला तुलनेने कमी म्हणजेच ८.८ रेटिंग मिळाली आहे. जी आतापर्यंतची सर्वात कमी रेटिंग आहे.
'पंचायत ४' बघितल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आपापले मत मांडले आहेत. एका युजरने लिहिले, 'संपूर्ण सीरिज पाहिली आणि पूर्ण निराश झालोय. काही सीन्स अगदीच स्लो आणि बोरिंग वाटले. कॉमेडी हीच सीरिजची युएसपी होती आणि त्याचीच कमी आहे'. तर आणखी एकाने लिहिले,'या सीझनचा शेवट निराशाजनक आहे. पण मी समजू शकतो टीमला पुढील सीझनची तयारी करायची असेल.' तर एका चाहत्याने तीव्र निराशा दाखवत लिहिले,'चांगली सीरिज खराब केली'.
'पंचायत ४' मध्ये यावेळी फुलेरा गावात निवडणूकीची धामधूम दाखवली. मंजू देवी आणि क्रांती देवी यांच्यात टक्कर असते. शेवटी बनराकस म्हणजेच भूषण जिंकतो असंही दाखवण्यात आलं आहे. प्रेक्षकांना अशा बऱ्याच गोष्टी यावेळी पसंत पडलेल्या नाहीत.