चित्रपटांनीही अधोरेखित केली दुष्काळाची दाहकतासध्या उन्हाच्या तडाख्याने देशातील अनेक राज्यांत पाण्याचे प्रचंड दुर्भीक्ष निर्माण झाले आहे. दुष्काळाच्या दाहकतेने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात पाण्याची नासाडी टाळण्यासाठी आयपीएलचे सामने दुसऱ्या राज्यात खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक कुटुंबांना घोटभर पाण्यासाठी मैलोन्मैल अक्षरश: पायपीट करावी लागत आहे. दुष्काळाच्या या दाहकतेने बॉलीवूडही अनभिज्ञ नाही. कायम रंजक स्वप्न विकणाऱ्या या चंदेरी दुनियेही आपल्या अनेक वास्तववादी चित्रपटातून पाण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. शेखर कपूर यांचा आगामी ‘पाणी’ हा चित्रपटही याच विषयावर आधारित आहे. या आणि अशाच काही चित्रपटांचा हा आढावा...जलपाणी या दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर समाजात जागृती करण्याच्या दृष्टीने ‘जल’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. यात मनोरंजनासह सामाजिक संदेशही आहे. गिरीश मलिक यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जल’ चित्रपटात अभिनेता पुरब कोहली आणि कीर्ती कुल्हारी यांच्या भूमिका आहेत. राजस्थानसारख्या वाळवंट आणि जंगलात राहणाऱ्या लोकांची पाण्यासाठी कशी ससेहोलपट होते, या संदर्भातील विदारक चित्र या चित्रपटात मांडण्यात आले आहे. ४६ दिवस चित्रीकरण झालेल्या या चित्रपटात पाण्याच्या समस्येची विदारक स्थिती अतिशय वास्तवपणे मांडण्यात आली आहे. चित्रपटात तनिष्ठा चॅटर्जी, सैद ज्युएल्स, मुकुल देव, यशपाल शर्मा यांच्या भूमिका आहेत. ग्रामीण जीवनाचे दर्शन या चित्रपटात घडविण्यात आले आहे. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारासह आॅस्करच्या ‘बेस्ट फिल्म आणि बेस्ट ओरिजनल स्कोर’ या दोन कॅटेगिरीमध्येदेखील नामांकन मिळविले होते. तहान ‘तहान’ या चित्रपटातून पाण्याचे दुर्भीक्ष, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सत्ताधारी, तसेच विरोधकांच्या एकमेकांच्या वाटमारीत सामान्यांच्या प्रश्नाकडे होत असलेले दुर्लक्ष, बोथट झालेल्या संवेदना यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. टंचाईग्रस्त महाराष्ट्र पाण्याच्या बाबतीत सधन व्हावा, यासाठी सामान्य माणसाची एक फॅन्टसी मांडण्यात आली आहे. पाणी नाही, म्हणून पीक नाही, पीक नाही म्हणून पैसा नाही. अशा वेळी शेतकऱ्यांना जगणे कठीण झाले आहे. यासाठी शेतकरी सावकाराकडून कर्जे काढतो, पण कर्जे फेडणार तरी कशातून. मग कर्जांचा डोंगर वाढत जातो आणि एक दिवस त्याच्यावर आत्महत्येची वेळ येते. त्याच्या असह्यतेचा फायदा राजकारण्यांकडून घेतला जातो. एखाद्याचे दु:ख कशा प्रकारे दुसऱ्याचे सुख बनू शकते, याचे विदारक चित्रण ‘तहान’मध्ये करण्यात आले आहे. दासबाबू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सदाशिव अमरापूरकर, अरुण नलावडे, कुलदीप पवार, सुनील शेंडे, विजय चव्हाण, विक्र म गोखले यांच्याबरोबरच सुनील बर्वे, आदिती भागवत, किशोर नांदलस्कर, सुरेखा कुडची, अश्विन एकबोटे, स्मिता ओक, किशोर प्रधान, भारती पाटील, अशोक समेळ, अभय कुलकर्णी आदी कलाकार या चित्रपटात आहेत.पानीआंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त असलेले चित्रपट निर्माता शेखर कपूर यांचा बहुचर्चित चित्रपट ‘पानी’ या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. भविष्यातील जलसंकटावर आधारित असलेल्या या चित्रपटात पाण्यावरून दोन गटांमध्ये होणारा वाद दाखविण्यात आला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि आयशा कपूर यांची यात प्रमुख भूमिका असेल. चित्रपटाचे शूटिंग भारतासह विदेशात करण्यात येणार आहे. मात्र, संपूर्ण चित्रपट केवळ ‘पानी’ या विषयाच्या भोवतीच असणार आहे. चित्रपटाला संगीतकार ए. आर. रेहमान यांचे संगीत असेल. शिनमा‘शिनमा’ या चित्रपटात पाण्याच्या भीषण समस्येचे चित्रण करण्यात आले आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. निर्माते अनिल जोशी यांच्या ‘वेदांत एंटरटेन्मेंट’ संस्थेच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केले आहे. अजिंक्य देव, विजय पाटकर, यतीन कार्येकर, किशोरी शहाणे, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे आदी कलाकारांची यात भूमिका आहे. पाण्याची समस्या जागतिक आहे. महाराष्ट्रात पाऊस खूप पडतो. मात्र, पाण्याचे योग्य नियोजन होत नाही. त्यामुळे दर वर्षी एप्रिल-मेमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवते. काही खेडी-पाडे वर्षांतील नऊ महिने तहानलेले असतात. हाच ‘शिनमा’चा विषय आहे.
- satish.dongre@lokmat.com