Join us  

'…तर मी दोन मुलांची आई असते', केतकी चितळेची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 4:49 PM

मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) तिच्या पोस्टमुळे सतत चर्चेत येत असते.

मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) तिच्या पोस्टमुळे सतत चर्चेत येत असते. शरद पवारांवरील एक पोस्ट केवळ शेअर केल्यामुळे तिला तुरुंगाची हवा खावी लागली होती. मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही केतकीने तिची वक्तव्यं सुरुच  ठेवली आणि ती पुन्हा चर्चेत येत गेली. दरम्यान आता तिने गुरु पौर्णिमेनिमित्त सोशल मीडियावर स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या आई-वडिलांचे आभार मानले आहेत. त्याबरोबर तिने तिच्या पंजीबद्दल आणि आजारपणाबद्दलही सांगितले आहे.

केतकी चितळेने इंस्टाग्रामवर स्वतःचा फोटो शेअर करत लिहिले की, प्राथमिक गुरू नेहमी आपले आई वडील असतात. मूल कळत नकळत नेहमीच मोठ्यांचे वागणे पाहत असतं आणि ते मोठ्यांचे वागणे कुठेतरी मनात छापून राहते. माझे लहानपण चित्रपटातील मुलांसारखे किंवा माझ्या वर्गातील इतर मुलांसारखे गेले नाही. प्रचंड विचित्र परिस्थितीत माझ्या बाबानी दाखवलेला संयम, व आईची खंबीर भूमिका, वयाच्या चौथ्या वर्षी पहिल्यांदा (माझ्या आठवणीत, अर्थात) छाप पाडून गेली. पुढे मुंबईत बॉम्ब स्फोट व दंगली झाल्या. तेव्हा आमचे घर विविध दुकानांचे गोडाऊन झाले कारण शिवाजी पार्क एपिसेंटर होते जवळपास. तेव्हा शिकले की कठीण समय येता नाव फक्त श्रीहरीचे घेऊन फायदा नसतो तर स्वतः श्रीहरी बनायचे असते.मग एपिलेप्सी डायग्नोस झाली आणि आई बाबाची एपिलेप्सी म्हणजे काय, हे शिकायची धडपड बघायला सुरुवात झाली. आपल्या मुलांकडून शिकावे यात त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही. बऱ्याच गोष्टी ते आमच्याकडून शिकत असतात व दर गुरुपौर्णिमेला पहिला मेसेज नेहमी आईचा असतो: आशिर्वाद व नमस्कार. पण ही शिकवण ते त्यांच्या पालकांकडून शिकले. वयाच्या ९९व्या वर्षी माझ्या आजोबांना इंसेप्शन हा चित्रपट पहिल्यांदा दाखवला आणि बुद्धी बघा त्यांची किती शार्प की जे "I am a Nolan fan" म्हंणाऱ्या ५०% लोकांना कळले नाही ते त्यांनी डोक्यावर हात मारून एका वाक्यात म्हंटले, 'स्वप्नातील स्वप्नातल्या स्वप्नात जे घडले त्यामुळे खऱ्या आयुष्यात हा माणूस पैसे देणार!' हे वाक्य ही कळायला अवघड आहे बऱ्याच "मराठी अस्मिता" बाळगणाऱ्या युवकांना, कारण simple मराठी नाही, असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

तिने पुढे सांगितले की लहानपणी माझी पणजी आमच्याकडे बऱ्याच वेळा यायची. ती इतकी स्ट्रॉंग बाई की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तुरुंगवास तिने भोगला होता. तीने कहाण्या (किस्से) सांगताना शिकवले की कुठल्याही परिस्थितीत माणसाने जगायला शिकावे आणि जगणे म्हणजे फक्त जिवंत राहणे नव्हे तर दुसऱ्यांना मदत करणे. एपिलेप्सीची ऋणी तर मी नेहमीच राहणार कारण एपिलेप्सी नसती तर केतकी चितळे एक किरकोळ सामान्य दादर शिवाजी पार्क, डोक्यावरून पाणी विले पारले मध्ये राहणारी दोन मुलांची आई जी आपण बरे, आपला परिवार बरा अशा विचारांची बाई असती. एपिलेप्सीने मला ताकद दिली लढायची, आपल्यावर हसणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तर द्यायची. एपिलेप्सी आपला एक भाग आहे मग कुणाला अधिकार नाही त्यावर हसायचा हे मनात ठाम एपिलेप्सीने केले. आज गुरुपौर्णिमा, सोशल मिडियावर फक्त या तिघांनाच साष्टांग नमस्कार."गुरू असतात अनेक, गुरू होतात अनेक, गुरू वागतात अनेक; पण मान कमवतात क्वचितच.

टॅग्स :केतकी चितळे