अभिनेत्री नेहा शितोळे(Neha Shitole)ने मराठी सिनेइंडस्ट्रीत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. ती अभिनेत्रीसोबत एक उत्तम लेखिका देखील आहे. सध्या ती कलर्स मराठी वाहिनीवरील अशोक मा. मा. या मालिकेत काम करते आहे. नुकतेच एका मुलाखतीत नेहा शितोळेने तिला राग आला किंवा रडू आलं तर ती झोपत असल्याचा खुलासा केला. तसेच यावेळी तिने पुणेकर दुपारी १ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत का झोपतात, यामागचे कारणदेखील सांगितले.
अभिनेत्री नेहा शितोळे हिने नुकतेच सुमन म्युझिकला दिलेल्या मुलाखतीत तिला राग आला किंवा रडू आलं तर काय करते याबद्दल सांगितलं. ती म्हणाली की, ''मी थेरपिस्टकडे गेले. त्यांची मदत घेतली. शिरीषा साठे म्हणून डॉक्टर आहेत त्या. त्यांनी खरंतर माझ्या भाषेत मला समजावून सांगितलं. त्या बोलतानाही समजा कधीतरी असं बोलताना मला रडू आलं किंवा काय झालं तर त्या म्हणतात मी आता तुला जवळ घेऊन अजिबात तुला बाबापुता करणार नाही. कारण मला घेणं देणंच नाहीये. आता तू रडतीयेस ह्याच्याशी. मला ह्याच्यानंतर तू रडू नयेस याची काळजी आहे. तर त्यावेळी सुद्धा आपल्याला कडक शब्दातही कोणीतरी काहीतरी सांगणं गरजेचं असतं. कारण नाहीतर काय होतं जवळ घेऊन ते सबसाइड होतं त्या पॉइंट पुरतं आणि ते राहून जातं तसंच ती गाठ. तू एक्सप्रेस केलंस. ती उकळणं गरजेचं असतं.''
''पुणेकरांना झोप अत्यंत प्रिय आहे...''
नेहा पुढे म्हणाली की, ''आणि दुसरी गोष्ट मी झोपते. आय स्लिप ओव्हर थिंग्स. जेव्हा मला भयंकर राग आलेला असतो किंवा खूप कसला तरी त्रास होत असतो आणि रडू येत असतं. खूप काहीतरी असं आतमध्ये आठवून आलेलं असतं तेव्हा दोन गोष्टी असतात की एकतर झोपल्यानंतर तुमची बॉडी शांत होते. श्वास शांत होतो आणि उठल्यानंतर बऱ्याचदा काय होतं ते आठवत पण नाही. पुणेकरांना झोप अत्यंत प्रिय आहे. आणि ती का आहे हे आता मला कळायला लागलंय. कारण मग पुणेकर चारनंतर नव्या जोमाने कामाला लागतात.''