Join us  

प्रेक्षकांना धक्का; झी मराठीवरील या तीन मालिका घेणार निरोप ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 12:10 PM

लवकरच तीन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून झी मराठीवरील मालिकांचा टीआरपी कमी होताना दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी माझ्या नवऱ्याची बायको व तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. नवीन मालिकांच्या कथानकात काहीच नावीन्य नसल्यामुळे त्याचा परिणाम टीआरपीवर पहायला मिळाला. मात्र आता झी मराठी वाहिनीवर मोठा बदल होताना दिसणार आहे. लवकरच तीन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

गेल्या आठवड्याभरात झी मराठीने तीन नवीन मालिकांचे प्रोमो प्रदर्शित केले आहेत. ती परत आलीये, माझी तुझी रेशीमगाठ, मन झालं बाजिंद या तीन मालिका लवकरच प्रसारीत होणार आहेत.

ती परत आलीये ही मालिका येत्या १६ ऑगस्टपासून रात्री १०.३० वाजता दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांना देवमाणूस मालिका बंद होणार का हा प्रश्न पडला होता. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवमाणूस मालिका बंद होणार नसून त्या मालिकेची वेळ बदलण्यात येणार असल्याचे समजते.

तीन नवीन मालिका दाखल होणार म्हटल्यावर कोणत्या मालिका निरोप घेऊ शकतात, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

झी मराठीवरील अग्गंबाई सूनबाई या मालिकेला सर्वात जास्त निगेटिव्ह प्रतिक्रिया मिळताना दिसून येतात. प्रेक्षकांच्या नापसंतीस उतरलेली ही मालिका ऑगस्ट महिन्याच्या मध्यात निरोप घेण्याची शक्यता आहे. या मालिकेचे कथानक माझ्या नवऱ्याची बायको मालिकेसारखे असल्याचे प्रेक्षकांकडून बोलले जाते.

झी मराठी वाहिनीवरील कारभारी लयभारी ही मालिका देखील बंद होणार असल्याचे समजते. लेखक व दिग्दर्शक असलेले तेजपाल वाघ यांची मन झालं बाजिंद ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तसेच, देवमाणूस मालिकेचा वेळ ११ ऐवजी ८.३० वाजता करण्यात आला तर तिसरी मालिका येऊ कशी तशी मी नांदायला ही देखील बंद होऊ शकते.

टॅग्स :झी मराठीअग्गंबाई सूनबाई