'गुलाबी साडी', 'एक नंबर तुझी कंबर' या सुपरहिट गाण्यांनंतर संजू राठोड आता नवीन गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'पिल्लू' हे संजू राठोडच्या नव्या गाण्याचं नाव असून नुकतंच ते प्रदर्शितही झालं आहे. संजू राठोडच्या आधीच्या गाण्यांप्रमाणे या गाण्यालाही चाहत्यांनी पसंती दिली आहे. त्याचं हे 'पिल्लू' गाणं सोशल मीडियावरही ट्रेंडिंग आहे. या गाण्यात संजूचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
संजू राठोडचं 'पिल्लू' हे गाणं जीएमई म्युझिक या चॅनेलवर रिलीज झालं आहे. या गाण्याची निर्मिती श्रीनाथ कोडग आणि चेतन चव्हाण यांनी केली आहे तर या रोमँटिक गाण्याचं दिग्दर्शन अभिजीत दाणी याने केलं आहे. या गाण्यात संजू राठोड आणि सेजल नायकरे यांची नवीन आणि आकर्षक जोडी पाहायला मिळत आहे.. या गाण्याचं संगीत दिग्दर्शन जी-स्पार्कने केलं आहे. हे गाणं संजू राठोड आणि मयुरी हरिमकर यांनी गायलं आहे. 'पिल्लू' गाण्याच्या गीतरचना संजू राठोड याने केले असून, हे गाणं यंदाच्या श्रावणी पावसात एक परिपूर्ण रोमँटिक ट्रीट ठरणार आहे.
'पिल्लू' गाण्याविषयी संजू राठोड सांगतो, “पिल्लू गाणं मी स्वतः लिहिल असून याचं कम्पोझिशन मी स्वतः केल आहे. हे गाणं माझ्या फार जवळच आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही माझ्या गुलाबी साडी आणि शेकी गाण्यांना जस प्रेम दिलत तसच प्रेम पिल्लू गाण्याला देखील द्या. तुम्हाला हे गाण कस वाटल हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा.”
दिग्दर्शक अभिजीत दाणी पिल्लू गाण्याच्या चित्रीकरणाविषयी सांगतात, “पिल्लू गाणं नाशिक येथील घोटी भागातील दौंडत गावात झालं आहे. या गावात नयनरम्य ठिकाण आहेत परंतु येथे बिबट्यांचा वावर देखील आहे. त्या गावातील गावकऱ्यांनी आम्हाला सांभाळून शूट करा अस सांगितल होत. हे गाव नाशिक शहरापासून दूर आहे. आमचा प्रोडक्शन मॅनेजर नाशिक सिटीमधून काही सामान आणायला गेला होता तेव्हा त्यांच्या गाडीसमोरून बिबट्या आडवा गेला. तेव्हा ते सेटवर आले आणि त्यांनी हा किस्सा सांगितला. तेव्हा आम्ही सगळे घाबरलो होतो परंतु टीमने खूप सपोर्ट केला. सगळ्यांनी न घाबरता शूट पूर्ण केले.”
पुढे तो सांगतो, “पिल्लू गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान संजूला धुळीची अलर्जी झाली होती. त्याचे ओठ आणि डोळे सुजले होते. त्याला त्वरित आम्ही डॉक्टरकडे नेल. तब्बल ५ तासानंतर त्याची सूज उतरली आणि आम्ही फर्स्ट टेक घेतला. हे गाण शूट करताना खूप चॅलेंजेस आले. पण सगळ्यांच्या सपोर्टने आज गाण प्रदर्शित झाल आहे. आणि प्रेक्षकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहे. त्यामुळे आनंद होतोय.”