Join us
Daily Top 2Weekly Top 5

रामायणाच्या या एपिसोडमध्ये असं काय घडलं? की जागतिक विक्रमही तुटला; लॉकडाऊनमध्ये रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 16:15 IST

लॉकडाऊनच्या काळात ही मालिका पुर्नप्रसारित केली गेली. याकाळातही या मालिकेने रेकॉर्डब्रेक टीआरपी मिळवली.

दूरदर्शनवरील रामायण ही लोकप्रिय मालिका भारतीय दूरचित्रवाणीच्या इतिहासातील एक इतिहास ठरली आहे. या मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचं नावही या मालिकेमुळे अजरामर झालं आहे.  1987 ते 1988 या काळात दूरदर्शनवर रामायण या मालिकेचं प्रसारण झालं. अरुण गोविल (श्रीराम), दीपिका चिखलिया (सीता), दारा सिंग (हनुमान), सुनील लाहिरी (लक्ष्मण) आणि अरविंद त्रिवेदी (रावण) यांच्या या मालिकेत प्रमुख भूमिका असलेली ही मालिका अभूतपूर्व गाजली. 78 भागांमध्ये चाललेली ही मालिका दर रविवारी सकाळी प्रसारित व्हायची आणि या काळात सगळे रस्ते ओस पडायचे. या मालिकेतील काही लोकप्रिय भाग जवळपास 8 कोटी ते 10 कोटी लोकांनी पाहिले होते. हा आकडा भारताच्या तेव्हाच्या लोकसंख्येच्या एक अष्टमांश इतका होता, यावरून या मालिकेच्या लोकप्रियतेचा अंदाज आलाच असेल.

 लॉकडाऊनच्या काळात ही मालिका पुर्नप्रसारित केली गेली. याकाळातही या मालिकेने रेकॉर्डब्रेक टीआरपी मिळवला. ‘रामायण’ या मालिकेतील लक्ष्मण आणि मेघनाद यांच्या युद्धाचा एपिसोड प्रसारित झाला होता. या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका सुनील लहरी यांनी साकारली होती. तर अभिनेते विजय अरोरा यांनी मेघनादची भूमिका साकारली होती. त्यांच्यातील हा युद्धाचा एपिसोड प्रचंड मोठ्या प्रमाणात पाहिला गेला. हा एपिसोड इतक्या लोकांनी पाहिला होता की या एपिसोडने नवा विक्रम नोंदवला होता. 

हा टेलिव्हिजन विश्वातील एक मैलाचा दगड ठरला. ७.७ कोटी प्रेक्षकांनी हा एपिसोड पाहिला होता. तसेच, या एपिसोडने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवले होतं. 

टॅग्स :रामायण