वृंदावनचे प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. त्यांचे विचार आणि कोणत्याही मानसिक समस्येवर त्यांनी दिलेलं धार्मिक उत्तर नेहमीच लोकांचे मन जिंकून घेते. विराट कोहोली, अनुष्का शर्मा यांसारखे अनेक सेलिब्रिटी प्रेमानंद महाराजांचे दर्शन घ्यायला वृंदावनला जातात. अलिकडेच अभिनेता करण खंडेलवाल आणि पारस छाब्रा हे संत प्रेमानंद महाराजांच्या आश्रयाला आले.
करण आणि पारस यांनी आध्यात्मिक जीवनाबद्दल प्रेमानंद महाराजांशी चर्चा केली. करण खंडेलवाल यानं त्याच्यावर काळी जादू झाल्याचं म्हटलं. तो म्हणाला, "कोणीतरी मला सांगितले आहे की माझ्यावर काळी जादू केली गेली आहे". यावर प्रेमानंद महाराज म्हणाले, "तुमच्यावर काळी जादू केली गेलेली नाही. जर असे झाले असते तर तुम्ही येथे नसता. काळी जादू असे काही नाही. कोणीतरी तुम्हाला मूर्ख बनवत आहे. भूत असे काही नाही, मी तुम्हाला सांगतो. फक्त निष्क्रिय बसू नका, व्यस्त रहा". प्रेमानंद महाराजांनी करण खंडेलवालला कसरत करण्याचा सल्ला दिला आणि राधा राणीचे नाव जपण्यास सांगितलं.
प्रेमानंद महाराजांना पारसने आपल्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळाविषयी सांगितलं. नैराश्य आणि तणावाने ग्रासलेल्या काळात कशा प्रकारे आध्यात्माच्या मदतीनं त्याने स्वतःला सावरलं, हे त्यानं सांगितलं. तो म्हणाला, "मी तुमचा सल्ला मानला आणि राधा राणीचा जप केला. तुमची गोष्ट ऐकून माझी आई वृंदावनला आली. जेव्हा मी कमवायला लागलो, तेव्हा मी वृंदावनमध्ये एक घरही विकत घेतलं".
पुढे तो म्हणाला, "आध्यात्मिक होण्यापूर्वी मी तणाव आणि नैराश्यात असायचो. मी तीन-चार वर्षे घराबाहेर पडलो नाही. मला खात्री होती की मी मरेन. मला असं वाटायचं की मला कर्करोग झाला आहे. मी खूप विचार करायचो आणि नकारात्मक गोष्टींनी वेढलेला असायचो. आता मी पूर्णपणे बरा झालो आहे". पारसच्या या अनुभवावर प्रेमानंद महाराजांनीही आनंद व्यक्त केला. त्यांनी पारसच्या आध्यात्मिक परिवर्तनाचं कौतुक करत त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.