फुलपाखरूमध्ये मानस वैदेहीचे प्रेम उलगडणारे नवीन गीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 09:20 IST
प्रेमाच्या एक ना अनेक परिभाषा उलगडवत, मानस (यशोमान आपटे) आणि वैदेही (हृता दुर्गुळे) यांच्या नितांत सुंदर प्रेमाचा प्रवास आपल्या ...
फुलपाखरूमध्ये मानस वैदेहीचे प्रेम उलगडणारे नवीन गीत
प्रेमाच्या एक ना अनेक परिभाषा उलगडवत, मानस (यशोमान आपटे) आणि वैदेही (हृता दुर्गुळे) यांच्या नितांत सुंदर प्रेमाचा प्रवास आपल्या मनापर्यंत पोहोचवणारी झी युवावरील एक प्रेमळ मालिका म्हणजे "फुलपाखरू". एका नाजूक प्रेमकथेवर आधारित फुलपाखरू या मालिकेमध्ये मानस - वैदेही या प्रेमीयुगुलांच्या अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी याआधी कथानकामध्ये श्रवणीय गाण्यांचा समावेश केला गेला आहे आणि प्रेक्षकांनी त्या गाण्यांना भरपूर पसंत देखील केलं आहे. असंच एक नवीन रोमँटिक गाणं आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत ज्यामध्ये मानस - वैदेही त्यांना मिळालेल्या एकांतामध्ये एकमेकांच्या हळुवार जवळ येत आहेत. तारुण्याच्या उंबरठ्यावर अल्लड वयात जुळलेलं मानस आणि वैदेही यांचं प्रेम दिवसेंदिवस खुलत आहे. एकमेकांना समजून घेत दोघेही आपल्या नात्याबाबत जास्त जबाबदार आणि गंभीर होत आहेत. रॉकीने दिलेलं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी मानस - वैदेहीने सुरु केलेल्या ”दोस्ती" बॅंडसाठी एक नवीन गाणं लिहायचं मानसने ठरवलं आहे, वैदेहीच्या म्हणण्यानुसार गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मानस हा वैदेहीच्या घरी गाणं लिहिण्यासाठी आला आहे. पूर्णरूपाने नुकतंच एकमेकांच्या जवळ आलेल्या या दोघांना वैदेहीच्या घरी त्यांना अनपेक्षित असा एकांत मिळतो. वैदेहीच्या प्रेमात आकंठ बुडालेला मानस गुढीपाडव्याला वैदेहीला साडीमध्ये पाहून पुरता घायाळ होऊन जातो. मानसला बरेच वेळ काहीही सुचत नाही, वैदेही त्याला सारखी आठवण करून देतीये की तो गाणं लिहिण्यासाठी इथे आलाय पण मानसने वैदेहीकडे पाहिलं की त्याला सगळं विसरायला होतंय. शेवटी वैदेही लटक्या रागाने त्याला सांगते की त्याचं गाणं लिहून होईपर्यंत ती दुसरी खोलीत जातीये. एवढं बोलून ती जायला निघते आणि मानसला सुचलेले गाण्याचे बोल तो गाऊ लागतो. आपल्या लाडक्या प्रेयसीसाठीचे त्याचे प्रेम, त्यांना मिळालेला एकांत आणि त्यांची एकमेकांबद्दलची ओढ मानसने आपल्या प्रेमगीतामधून व्यक्त केली आहे.