'मुरांबा' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री प्रतिमा कुलकर्णी या लोकप्रिय दिग्दर्शिका आहेत. अनेक नाटक, मालिकांचं त्यांनी दिग्दर्शन केलं आहे. सध्या त्या 'मुरांबा' मालिकेत आईआजी ही भूमिका साकारत आहेत. प्रतिमा कुलकर्णी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या लग्नाबद्दल भाष्य केलं. प्रतिमा कुलकर्णी यांनी जपानी व्यक्तीशी लग्न केलं होतं. याबद्दल त्यांनी मुलाखतीत सांगितलं.
प्रतिमा कुलकर्णी यांनी नुकतीच 'आरपार' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना "जपानी माणसाशी लग्न करणार म्हटल्यावर घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या?", असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, "जपानी माणसाशी लग्न करायचं म्हटल्यानंतर माझ्या घरात काहीच बवाल झाला नाही. मी जेव्हा एकटं राहायचं ठरवलं तेव्हीही काहीच झालं नाही. कारण, माझे आईवडील मुंबईत असतानाच मी एकटी राहत होते. १९९१ साली मी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला तेव्हाही त्यांनी शांतपणेच घेतलं".
पुढे त्या म्हणाल्या, "माझ्या नवऱ्याचं नाव काजिरो होतं. काजिरो घरी यायचा. तो खूप लाघवी मुलगा होता किंवा आहे. माझ्या आईवडिलांशी भावाशी त्याची चांगली मैत्री होती. त्यामुळे मी जपानी माणसाशी लग्न करतेय यापेक्षा मी काजिरोशी लग्न करतेय असं त्यांना वाटलं. त्यामुळे ते म्हणाले की आपण नाही म्हटलं तर ती आयुष्यभर दु:खी होईल. तिला सतत वाटत राहील की ते व्हायला हवं होतं. तर मग त्यापेक्षा तिच्या मनासारखं होऊ दे. पण, जेव्हा मी परत आले तेव्हा माझ्या वडिलांना त्याचं आश्चर्य वाटलं नाही. कारण, त्यांना माहीत होतं हे असं होणारे".