स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' (Muramba Serial) मालिकेने नुकताच ११०० भागांचा टप्पा पार केला. रमा-अक्षय या जोडीसोबतच संपूर्ण मुकादम कुटुंबाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. अक्षय मुकादमची भूमिका साकारणाऱ्या शशांक केतकरने आजवर बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र शशांकच्या करिअरमधली मुरांबा ही सर्वाधिक भागांची मालिका ठरली आहे. शशांकने याविषयी आनंद व्यक्त केला आहे.
शशांक केतकर म्हणाला की, ''कोणताही नवा प्रोजेक्ट सुरु करताना प्रत्येक कलाकाराच्या मनात धाकधुक असते. पण आमचं तसं झालं नाही कारण स्टार प्रवाहसारख्या उत्तम वाहिनीचं पाठबळ आणि उत्तम दिग्दर्शकांचं मार्गदर्शन मिळालं. अप्रतिम अशी वाक्य आमच्या हाती आली आणि धुमधडाक्यात सुरु झाली आमची मुरांबा मालिका. १४ फेब्रुवारी २०२२ ला प्रेक्षकांना मिळाली आमची मुरांबा ही मालिका आणि आम्हाला भेटलं मुकादम कुटुंब. या कुटुंबात होती जीवाला जीव देणारे, हसवणारे, रडवणारे, कान पिळणारे, आशीर्वाद देणारे, टाईमपास करणारे आणि कामाच्या वेळेला चोख काम करणारे आमचे मुरांबाचे सदस्य. सगळ्या टीमने सकारात्मकतेने काम केलं की पुरस्कार मिळतातच पण त्यापेक्षा रमा-अक्षय जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांना प्रेम मिळालं हे सगळ्यात महत्त्वाचं. ''
''पहिल्या दिवसाची धाकधूक आणि आता ११०० भाग पूर्ण केल्यानंतरचा आत्मविश्वास सगळं अगदी तसंच आहे. स्टार प्रवाह वाहिनी आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार. तुमच्या विश्वासाशिवाय आणि सहकार्याशिवाय हे अशक्य होतं'', असं शशांक म्हणाला. मुरांबा मालिकेचा यापुढचा टप्पा आणखी रंजक आणि उत्कंठावर्धक असणार आहे. रमा-अक्षयच्या आयुष्याला लवकरच नवी कलाटणी मिळणार आहे.