Abhidnya Bhave: मराठी मालिकाविश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे. 'खुलता कळी खुलेना','तुला पाहते रे'अशा गाजलेल्या मालिकांमधून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. आता 'तारिणी' मालिकेतून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत ती कौशिकीला नावाचं पात्र साकारते आहे. याचनिमित्ताने अभिनेत्री तिने दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत अभिज्ञाने तिच्या आठवणीतला एक किस्सा शेअर केला.
अलिकडेच अभिज्ञा भावेने 'मराठी मनोरंजन विश्व' ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, अभिज्ञाने तिच्या बालपणी घडलेला किस्सा सांगितला. त्याविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली,"मी ट्रेनमधून जेव्हा प्रवास करायचे त्यावेळी माझ्यासमोर एक बाई बसली होती. त्या बाईची दोन मुलंही तिच्यासोबत होती, एक मुलगा आणि एक मुलगी होती. तेव्हा त्या मुलाने मोठ्या बहिणीला मारलं आणि आई काहीच बोलली नाही. एकदा मारलं, दुसऱ्यांदा मारलं तेच चालू होतं. त्यादरम्यान, एक बाई आली आणि तिने त्या मुलाच्या जोरात कानशिलात लगावली.त्या मुलाची आई समोरच होती आणि त्या बाईने मुलाच्या आईला सांगितलं की, तुम्ही जे करणं अपेक्षित आहे ते मी करते आहे आणि त्याचं मला खूप वाटतंय. जर का तुम्हाला आई म्हणून हे सगळं ठीक वाटतं असेल पण हे तुमच्या मुलीसोबत घडतंय. मुद्दा काही असो पण अशा गोष्टी सार्वजनिक ठिकाणीच काय प्रायव्हेट स्पेसमध्ये देखील घडणं चुकीचं आहे. ती घटना माझ्या लक्षात राहिली."
त्यानंतर पुढे अभिनेत्री म्हणाली,"तेव्हापासून मी एक नियम फॉलो करते की, मैत्रीण असो मित्र असो किंवा जवळचं असो तसेच कोणी नातेवाईक असो.जिकडे मला दिसतंय काहीतरी चुकीचं घडतंय तिकडे मी बोलते. त्याच्यामुळे खूपदा गोत्यात आली आहे. पण, त्याने मला काहीच फरक पडत नाही. मला जर एखाद्याच्या बाबतीत चुकीची गोष्ट वाटली जी मला नाही आवडली, तर त्यावर मी व्यक्त होते. एक रिलेशनशिप तेव्हाच तयार होतं जेव्हा तुम्ही व्यक्त होऊ शकतो, चांगलं वाईट दोन्ही काही असेल.पण, आपण कुठे काय बघतो ते जरा का चुक असेल तर त्यावर आपलं मत व्यक्त करणं पुरेसं असतं. जे आजच्या जगात घडत नाही."असा किस्सा सांगत अभिनेत्रीने तिचं मत व्यक्त मांडलं.