स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका 'लग्नानंतर होईलच प्रेम'( Lagnanantar Hoilach Prem Serial)चं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय. जीवा आणि काव्याच्या नात्याचा गुंता वाढत असतानाच आता जीवाने एक टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. काव्यावरच्या प्रेमाची असलेली एकमेव निशाणी म्हणजेच काव्याच्या नावाचा टॅटू जीवा नष्ट करणार आहे. नंदिनीचा लग्नावरचा विश्वास उडू नये यासाठी जीवाने हा निर्णय घेतला आहे.
'लग्नानंतर होईलच प्रेम'मधील हा थरारक सीन शूट करणं तितकंच आव्हानात्मक होतं. मालिकेच्या संपूर्ण टीमने या सीनसाठी खूप मेहनत घेतली होती. या सीनच्या शूटिंगविषयी सांगताना अभिनेता विवेक सांगळे म्हणाला, ''गेल्या महिनाभरापासून या सीनबद्दल सतत चर्चा होत होती. त्यामुळे मानसिकरित्या मी या सीनसाठी तयार होतो. हा संपूर्ण सीन नाईट शिफ्टमध्ये करण्यात आला आहे. जळतं लाकूड छातीवर ठेवण्याचा सीन करताना खूप काळजीपूर्वक सर्व हाताळावं लागत होतं. कुठेही इजा होणार नाही याकडे संपूर्ण टीमचं लक्ष होतं.''
विवेक पुढे म्हणाला, ''एक अभिनेता म्हणून अशा पद्धतीचे सीन करायला मिळत आहेत. यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. यापुढे देखील अनेक घडामोडी मालिकेत घडणार आहेत.''