# लय आवडतेस तू मला मालिका (# Lai Aavadtes Tu Mala Serial) रंजक वळणावर आली आहे. मालिकेत सरकार - सानिकाचा कळशी गावातील गावकऱ्यांसोबतच लढा सुरुच आहे. साहेबरावांनी साखर कारखाना बंद केल्यानंतर कळशीगाव बेरोजगारीसाठी सानिका आणि सरकारला जबाबदार धरतं. मात्र, या विरोधातही सानिका हार मानत नाही. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ती एक नवा मार्ग शोधते आणि तो म्हणजे 'चहाचा गूळ’ तयार करण्याचा. मात्र, गावकरी तिच्या कल्पनेला अशक्य मानून तिची खिल्ली उडवतात. सानिका आव्हान स्वीकारून स्वतः गूळ बनवून दाखवण्याचा निर्धार करते.
सरकारदेखील महादेवाची कृपा मिळवण्यासाठी कठोर व्रत करताना दिसणार आहे. सानिकाच्या अथक प्रयत्नांना यश मिळावे, म्हणून सरकार प्राचीन महादेव मंदिरातील शिवलिंगावर १०१ वेळा नदीचे पाणी वाहण्याचा संकल्प करतो. एकीकडे सानिका गावकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि बेरोजगारी मिटवण्याच्या प्रयत्नात आहे तर दुसरीकडे सरकार तिला यश मिळावे यासाठी झुंजतो आहे. एकाला यश पाहिजे, तर दुसऱ्याला देवाचा आशीर्वाद. महादेवाच्या आशीर्वादाने सानिका - सरकार कसे हे आव्हानं पार करणार हे पाहणे कमालीचे ठरेल.
खूप आव्हानात्मक अनुभव होता-तन्मय जक्का
याबद्दल सरकारची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय जक्का म्हणाला, "हा सीन चित्रीत करताना खूप आव्हानात्मक अनुभव होता. रणरणत्या उन्हात आम्ही हा सीन शूट केला... जवळपास ३-४ तास लागले, तीव्र उन्हामुळे चटके तर लागतच होते पण पाय खरंच पोळले होते आणि १०१ फेऱ्या पूर्ण केल्यासारखं वाटलं. पण त्यानिमित्ताने महादेवाची सेवा करण्याची संधी मिळाली, हे विशेष वाटतं. दरम्यान, उष्णतेमुळे थोडं कठीण झालं पण टीमने त्वरित काळजी घेतली. अशा सीनसाठी फिटनेस खूप महत्त्वाचा असतो, कारण शारीरिक आणि मानसिक तग धरावा लागतो,"