अभिनेत्री तितीक्षा तावडेसाठी ही अभिनेत्री आहे प्रेरणास्थान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2017 17:01 IST
अभिनेत्री तितीक्षा तावडे सध्या छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरत आहे.'सरस्वती' या मालिकेतील तिची भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरते आहे. या ...
अभिनेत्री तितीक्षा तावडेसाठी ही अभिनेत्री आहे प्रेरणास्थान
अभिनेत्री तितीक्षा तावडे सध्या छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरत आहे.'सरस्वती' या मालिकेतील तिची भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरते आहे. या मालिकेत नव नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहे.'सरस्वती' जुन्या वाड्यामध्ये परतली आहे.'सरस्वती' विश्राम मोरे म्हणून ती संकटांना कशी सामोरं जाईल,राघवचा गैरसमज दूर कसा करेल अशी आव्हानं तिच्यापुढे आहेत.याच निमित्ताने अभिनेत्री तितीक्षा तावडे हिच्याशी साधलेला हा खास संवाद. 'सरस्वती' वाड्यामध्ये परतली आहे सरस्वती विश्राम मोरे म्हणून काय सांगशील?मोठे मालक म्हणजेच राघवने सरस्वतीला वाड्यामधून बाहेर काढले त्यामुळे ती खूप दु:खात होती. मात्र आता ती वाड्यामध्ये परतली आहे सरस्वती विश्राम मोरे म्हणून. राघवचा गैरसमज तिला दूर करायचा आहे. आता खचणार नाही आणि मोठ्या मालकांचा म्हणजेच राघवचा विश्वास परत मिळवणारच असा तिने निर्धार केला आहे . सत्य समोर आणणार असल्याचे तिचा प्रयत्न असेल. एकूणच मालिका एका वेगळ्या वळणावर पोहचली आहे. रसिकांना या मालिकेत नवनवीन गोष्टी पाहायला मिळणार असून त्यांचे मनोरंजन होईल असा विश्वास आहे. सोशल मीडियावर तू किती एक्टिव्ह असते आणि सोशल मीडियाच्या वापराबाबत तुझं काय मत आहे ?सोशल मीडियामुळे फॅन्सशी थेट कनेक्ट होऊन संवाद साधता येतो. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया तात्काळ कळतात. फॅन्सना थेट भेटता येत नसलं तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट होता येतं. मात्र कोणत्याही गोष्टीचे फायदे जसे असतात तसे तोटेही असतात. सोशल मीडियाचेही काही तोटे आहेत. कधी कधी काही अतिउत्साही फॅन्स विचित्र कमेंट्स देतात. किती रटाळ अभिनय करते, ओव्हर एक्टिंग करते अशा निगेटिव्ह कमेंटही सोशल मीडियावर येत असतात. खरं तर हे एक खुलं व्यासपीट असलं तरी कमेंट्स देताना रसिकांनी विचार करुन भानावर राहून कमेंट द्यायला हव्यात. मात्र या सगळ्या गोष्टींचा मी फार विचार करत नाही. कारण हजार कमेंट्समध्ये 10 कमेंट्स वाईट असल्या म्हणून काय झाले. बाकीच्यांना आपलं काम आवडतं असा मी विचार करते. अशा विचित्र कमेंट्सकडे दुर्लक्ष करणे आणि सकारात्मक राहणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. या क्षेत्रात येण्यासाठी तुला किती स्ट्रगल करावा लागला आणि स्ट्रगलबद्दल तुला काय वाटते ?स्ट्रगल हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. तो स्ट्रगल कुणालाही चुकलेला नाही. मी सुद्धा दोन वर्षे स्ट्रगल केले आहे. सतत ऑडिशन दिल्या आहेत. ऑडिशनच्या वेळी सांगितलं जायचं की तुम्हाला फोन करुन कळवू. मात्र फोन करुन कळवू म्हणजे नेमकं काय याचा अर्थच उमगला नाही. मात्र हळूहळू सगळ्या गोष्टी समजू लागल्या. फोन करु म्हणजे तुम्हाला नक्की फोन करु असं नाही. ती एक बोलण्याची पद्धत असते. तरीही न खचता ऑडिशन देत गेले आणि छोट्या मोठ्या भूमिका मिळत गेल्या. त्या भूमिका प्रामाणिकपणे साकारल्या. प्रमुख व्यक्तीरेखा असलेली सरस्वती ही माझी पहिलीच मालिका आहे. या क्षेत्रात येण्यासाठी तुला प्रेरणा कुठून मिळाली ? तुझी बहिण खुशबू हिचा यांत किती मोठा वाटा आहे ?माझं या क्षेत्रात येण्याचं खरं प्रेरणास्थान म्हणजे माझी बहिण अभिनेत्री खुशबू तावडे. तिच्याकडे पाहून मला कायमच वाटायचे की मी सुद्धा टीव्हीवर झळकू, तिच्यासारखा अभिनय करु. हॉटेल मॅनेजमेंट केले असल्यामुळे याआधी मी मॅकडोनल्डमध्ये मॅनेजर म्हणून काम केलं आहे. मात्र माझं मन तिथं काही रमलं नाही. खुशबूच्या चार वर्षानंतर मी या क्षेत्रात पाऊल ठेवलं. मात्र जेव्हा खुशबूला समजलं की मला अभिनय करायचा आहे त्यावेळी तिने मला प्रोत्साहित केले. या क्षेत्रातले बारकावे तिने समजावले. टीव्हीवर झळकायचे म्हणून या क्षेत्रात येण्यापेक्षा आपण खरंच त्या गोष्टीला न्याय देऊ शकतो का या गोष्टी समजावल्या. मला तिने कधीच कमी लेखलं नाही किंवा हे तुला जमणार नाही असं सांगितलं नाही. कोणताही निगेटिव्ह विचार तिनं मनात येऊ दिला नाही. नेहमीच तिने मला प्रोत्साहित केलं. मात्र माझी बहिण आहे म्हणून तुझी शिफारस करेन अशा विचारात राहू नको, तुझ्या अभिनय कौशल्यावरच तुला सर्व मिळवावं लागेल असं तिने सांगितले होते. मी सुद्धा तिला निराश केले नाही आणि आज या क्षेत्रात मी आहे. एक किस्सा शेअर करायला आवडेल. डोबिंवलीत आमचं गिफ्ट शॉप आहे. तिथे खुशबु आणि माझे फोटो आई-बाबांनी लावलेत.जेव्हा ग्राहक विचारतात की यांनीही तुमच्या दुकानाला भेट दिली आहे. तेव्हा माझे आई- बाबा त्यांना माझ्या या मुली आहेत असं सांगतात. त्यावेळी त्यांच्या चेह-यांवरचा आनंद काही औरच असतो. हा एक अभिमानास्पद क्षण आणि गोष्ट आहे असं मला वाटते. पालक सध्या मुलांना अगदी लहान वयात अभिनय करायला लावतात या गोष्टीकडे तू कसं पाहते?आज बरीच लहान मुलं आहेत ज्यांना इच्छा नसूनही अभिनय करावा लागतो. मी स्वतः पाहिलं आहे की आई-बाबा त्यांच्या मुलांना ऑडिशनला घेऊन जातात. तिथे जाऊन नीट बोल, हे कर ते कर असं सांगतात. खरे तर लहान मुलांना या सगळ्या गोष्टींची समजही नसते. मात्र पालकांनी त्यांच्या इच्छा आपल्या मुलांवर थोपणं ही चुकीची गोष्ट आहे असं मला वाटते. त्यांनी तसं करु नये असं मला मनापासून वाटते. लहान मुलांना त्या त्या गोष्टीची जाणीव होऊ द्या तेव्हाच त्यांना त्या गोष्टी करायला सांगा. स्पर्धा ही प्रत्येक क्षेत्रात आहे. कोणत्या स्पर्धेत उतरायचे हे आपण ठरवलं पाहिजे. आणखी एक गोष्ट ती म्हणजे पालक आपल्या मुलांचं असं काही कौतुक करतात की ती मुलं आपण म्हणजे ग्रेट असं समजू लागतात. मुलांच्या समोर अतिकौतुक केले जाते ते टाळणं गरजेचे असते. त्यामुळे आपली मुलं नेमकी कुठे कमी पडतात ते समजेल.छोट्या पडद्याशिवाय तुझ्या आगामी प्रोजेक्टविषयी जाणून घ्यायला आवडेल ?वेबसिरीजच्या मला ब-याच ऑफर्स येतात. मात्र मालिकेच्या कमिटमेंटमुळे त्यासाठी वेळ देणं शक्य होत नाही. याशिवाय नाटक आणि सिनेमाही करायचा आहे. मात्र मालिकांमधून वेळ मिळत नाही. भविष्यात नाटक करण्याची इच्छा आहे. कोडमंत्र या नाटकातील मुक्ता बर्वेच्या भूमिकेसारखी भूमिका करायला आवडेल. मुक्ताने ती भूमिका उत्कृष्टरित्या रंगवली आहे. अभिनयाशिवाय तुला आणखी काय काय करायला आवडतं ?मला पेंटिग आणि वाचनाची आवड आहे. मी फिटनेस प्रेमी नाही, मात्र तरी आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिममध्ये व्यायाम करते. सध्या मी किक बॉक्सिंग शिकत आहे. वर्कआऊटमध्ये थोडा बदल केला तर कंटाळा येत नाही. उलट यामुळे जास्त एन्जॉय करतो. झुंबा, कार्डिओ असं बदल करत राहिले आणि वर्कआऊटच्या पद्धती बदलल्यामुळे रटाळपणा आणि तोच तोचपणा राहत नाही.