‘तुझं माझं ब्रेकअप’ मालिकेचे २०० भाग पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 13:17 IST
असं म्हणतात की प्रेम हे आंधळं असतं आणि लग्नानंतर डोळे उघडतात... तसेच काहीसे झी मराठी वरील 'तुझं माझं ब्रेकअप' ...
‘तुझं माझं ब्रेकअप’ मालिकेचे २०० भाग पूर्ण
असं म्हणतात की प्रेम हे आंधळं असतं आणि लग्नानंतर डोळे उघडतात... तसेच काहीसे झी मराठी वरील 'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेतील समीर आणि मीरा बाबतीतही होते. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस प्रेम आणि आनंदात पार पडतात. पण त्याचा गोडवा ओसरला की मग सुरू होते संसाराची तारेवरची कसरत. लग्नाआधी एकमेकांच्या अवगुणांवर पडदा टाकणारे हे दोघे लग्नानंतर कोणताही आडपडदा न ठेवता एकमेकांच्या चुका काढायला लागतात आणि भांडायलाही लागतात.... बघता बघता हे भांडण एवढ्या टोकावर जातं की ते दोघे वेगळे होतात. आजच्या परिस्थितीशी मिळतीजुळती कथा असलेल्या या मालिकेने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. प्रेक्षकांचे प्रेम आणि अखंड पाठिंब्यामुळे या मालिकेने नुकतेच २०० भाग पूर्ण केले. या मालिकेत प्रेक्षकांना नेहमीच ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळतात. समीर आणि मीरा हे जणू काही आजच्या तरुण विवाहित जोडप्याचं प्रतिनिधित्वच छोट्या पडद्यावर करत आहेत असं वाटतं. रोहिणी हट्टंगडी यांनी साकारलेली आजी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आणि ही प्रेमळ पण वेळेप्रसंगी एकेकाला अद्दल घडवणारी आजी प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवते. या मालिकेचे हे यश सर्व टीमने सेटवर केक कापून साजरं केलं. यावेळी कलाकारांनी संपूर्ण टीमचे कौतुक केले आणि २०० एपिसोड्सचा यशस्वी टप्पा गाठल्याचा आनंद एकत्र साजरा केला.लग्नानंतर सरलेल्या प्रेमाची उरलेली गंमतीदार गोष्ट अर्थात 'तुझं माझं ब्रेकअप' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. प्रेम विवाह झालेल्या जोडप्यांना आपलीशी वाटणारी ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून समीर आणि मीराच्या नात्याची ही आगळीवेगळी कहाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, केतकी चितळे, साईंकित कामत, राधिका बर्वे, उदय टिकेकर, राधिका विद्यासागर यांच्या मुख्य भूमिका आहेत. तुझं माझं ब्रेकअप या मालिकेतील समीर आणि मीराच्या प्रेमकथेला आगामी भागात नवीन वळणं मिळणार असून यामुळे मालिका अधिकच रंजक होणार आहे. Also Read : म्हणून चक्क 'या' व्यक्तीनेच केतकीच्या तोंडाला लावली टेप!