Join us  

‘चंद्र आहे साक्षीला’ नवीन मालिका रसिकांच्या भेटीला, या कलाकारांच्या आहेत भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2020 3:35 PM

‘चंद्र आहे साक्षीला’ ११ नोव्हेंबरपासून मालिका रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. श्रीधरची भूमिका आपल्या सगळ्यांचा लाडका सुबोध भावे साकारणार असून स्वातीची भूमिका ऋतुजा बागवे निभावणार आहे.

ते म्हणतात ना प्रेम एकदा तरी करून पहावे. पण हा विश्वास का एकदा तुटला की मग तो सगळा प्रवास एका मृगजळासारखा वाटू लागतो. असून नसल्यासारखं, डोळ्यांना दिसलं तरी समोर जाताच चकवा देणारं, दुरून अतिशय सुंदर तर जवळ गेल्यावर अस्तित्वात नसणारं. अशीच हळुवार प्रेमकहाणी सुरू होते आपल्या स्वाती आणि श्रीधरमध्ये पण यांच्या कथेला रहस्याची किनार आहे. काय असेल हे रहस्य ज्यामुळे स्वातीचे आणि त्याचसोबत श्रीधरचे संपूर्ण आयुष्य बदलून जाणार आहे.  

चिन्मय मांडलेकर लिखित आणि मुळाक्षर प्रॉडक्शन निर्मित ‘चंद्र आहे साक्षीला’ ११ नोव्हेंबरपासून मालिका रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. श्रीधरची भूमिका आपल्या सगळ्यांचा लाडका सुबोध भावे साकारणार असून स्वातीची भूमिका ऋतुजा बागवे निभावणार आहे.

आपल्या कथेतील स्वाती मध्यमवर्गीय, अतिशय सोशिक, साधी सरळ ‘फसवणुकीवर उभं असलेलं नातं पत्याच्या बंगल्यापेक्षा तकलादू असतं’ असे तिचे म्हणणे आहे” आणि याचमुळे स्वभवाने चांगली असून देखील वयाच्या चौतीसाव्या वर्षी देखील स्वाती अविवाहित आहे. अशाच स्वातीच्या आयुष्यात श्रीधर नकळतपणे येतो आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दोघांमधील प्रेम हळूहळू फुलू लागतं. जसजसे दिवस पुढे सरकू लागतात एकमेकांवरच प्रेम आणि विश्वास वाढू लागतो आणि दोघे लग्न करण्याचा निर्णय घेतात या दोघांचे आयुष्य नक्की कोणाच्या आणि कोणत्या रहस्याने पुर्णपणे बदलून जाणार ? स्वाती आणि श्रीधरच्या या पिक्चर परफेक्ट जगात नक्की काय घडणार ? हे लवकरच आपल्याला कळणार आहे. 

 मालिकेचा निर्माता आणि लेखक चिन्मय मांडलेकर म्हणाला, या मालिकेच्या निमित्ताने माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट घडते आहे ती म्हणजे महाराष्ट्राचा सुपरस्टार, सुप्रसिध्द अभिनेता आणि माझा पहिला सहकलाकार सुबोध भावे सोबत इतक्या वर्षांनंतर निर्माता आणि अभिनेता या नात्याने आम्ही दोघं एकत्र येत आहोत... सुबोधने आजवर अतिशय चोखंदळपणे मालिकांची निवड केली आहे आणि हेच कारण असावं त्याने या मालिकेचा विषय, श्रीधरची भूमिका ऐकताच होकार दिला... मालिकेमधील इतर कलाकार देखील गुणी आहेत सगळ्यात महत्वाची आमच्या मालिकेची नायिका ऋतुजा बागवे उत्तम अभिनेत्री आहे... मालिकेमध्ये अनेक उत्तम कलाकरांची फौज आहे यासगळ्यांना घेऊन आम्ही प्रेक्षकांना एक चांगली गोष्ट सांगू पाहतो आहे.

कलर्स मराठीसोबत गेल्या चार वर्षांपासून माझी ही सलग तिसरी मालिका आहे जीव झाला येडापिसा आणि राजा रानीची गं जोडी या मालिका मी लेखक म्हणून करत आहे, या दोन्ही मालिका प्रचंड गाजत आहे याचा मला आनंद आहे... ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल अशी आशा आहे”.

  

टॅग्स :सुबोध भावे ऋतुजा बागवे