Join us
Daily Top 2Weekly Top 5

रश्मिका-विजयच्या लग्नावर प्रश्न विचारताच ऋषभ शेट्टीनं दोन शब्दात संपवला विषय, जुना वाद चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 11:40 IST

रश्मिका–विजय यांच्या विवाहामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असताना, दुसरीकडे या जुन्या नातेसंबंधांवरून पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकले. या शाही लग्नाची जगभरात चर्चा होत आहे. यातच लोकप्रिय दिग्दर्शक आणि कन्नड सुपरस्टार ऋषभ शेट्टीने विजय आणि रश्मिकाच्या लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिलेली प्रतिक्रिया आता चर्चेचा विषय ठरली आहे.

'कांतारा' फेम ऋषभ शेट्टी सध्या त्याच्या आगामी 'जय हनुमान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी त्याला रश्मिकाच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला. "सर, रश्मिका मंदाना लग्न करत आहे, तुम्हाला लग्नाचं आमंत्रण मिळालं का?" असा प्रश्न विचारताच ऋषभने कोणतेही उत्तर दिले नाही. तो फक्त मिश्किलपणे हसला, "धन्यवाद" म्हणाला आणि तिथून निघून गेला. 

जुन्या वादाची किनाररश्मिका मंदानाने चित्रपट रसिकांचं लक्ष वेधलं ते 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड' या तेलुगू चित्रपटांमधून. मात्र तिचं चित्रपट सृष्टीतील पदार्पण हे 'किरीक पार्टी' या कन्नड चित्रपटातून २०१६ साली झालं होतं. या चित्रपटाचा दिग्दर्शक ऋषभ शेट्टी होता. किरीक पार्टी चित्रपटाची निर्मिती रक्षित शेट्टी आणि जी. एस. गुप्ता यांनी केली. तसंच रक्षित शेट्टी हा या चित्रपटात प्रमुख भूमिकेतही होता. शिवाय हा चित्रपट त्यानेच लिहिलेला होता.  रक्षितची हिरोईन म्हणून रश्मिकाची या चित्रपटात वर्णी लागली होती.

याच दरम्यान रक्षित आणि रश्मिका यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होऊन त्यांनी साखरपुडाही केला होता. मात्र काही कारणांमुळे दोघांचा साखरपुडा मोडला होता. साखरपुडा मोडल्यानंतर आणि नंतर झालेल्या शाब्दिक युद्धामुळे रक्षित, ऋषभ आणि रश्मिका यांच्यात मैत्रीत मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यानंतर २०२३ मध्ये रश्मिकाने एका मुलाखतीत रक्षितच्या निर्मिती संस्थेचा उल्लेख करताना "तथाकथित प्रॉडक्शन हाऊस" असा शब्दप्रयोग केला होता. यावर ऋषभ शेट्टीनेही रश्मिकाचे नाव न घेत संताप व्यक्त करत म्हटले होते की, "मला 'तशा' अभिनेत्रींसोबत काम करायला आवडत नाही".

केवळ ऋषभच नाही, तर रक्षितचा दुसरा जवळचा मित्र प्रमोद शेट्टी यानेही रश्मिकाच्या लग्नावर भाष्य केलं. प्रमोद म्हणाला, "मला लग्नाचं आमंत्रण मिळालेलं नाही आणि ती आम्हाला आमंत्रित करणार नाही हे आम्हाला माहित आहे, यात काही नवीन नाही. रक्षितबद्दल सांगायचं तर, तो काही चॉकलेट खाऊन रडत बसणारा मुलगा नाही". प्रमोदच्या या विधानावर रश्मिकाच्या चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, याला "घृणास्पद" म्हटले. रश्मिका–विजय यांच्या विवाहामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असताना, दुसरीकडे या जुन्या नातेसंबंधांवरून पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rishab Shetty evades Rashmika-Vijay wedding question, old feud resurfaces.

Web Summary : Rishab Shetty dodged questions about Rashmika Mandanna and Vijay Deverakonda's wedding, sparking renewed interest in their past relationship and disagreements following Rashmika's debut film and broken engagement with Rakshit Shetty. Pramod Shetty also commented on the situation.
टॅग्स :रश्मिका मंदानाविजय देवरकोंडाऋषभ शेट्टी