दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या राजश्री प्रोडक्शनच्या ‘प्रेम रतन धन पायो’ला बॉक्स आॅफिसवर मिळालेल्या यशाचे श्रेय सूरज बडजात्यांपासून सलमान खान आणि सोनम कपूरपर्यंत सर्वांनाच जाते. या सर्व कलावंतांना मिळणारे श्रेय बघून अमृता राव थोडीशी हिरमुसली आहे. याच अमृता रावने राजश्री प्रोडक्शनच्या सूरज बडजात्या दिग्दर्शित विवाह चित्रपटात शाहिद कपूरसोबत अभिनय केला होता आणि हे सांगणे अनुचित नाही होणार की हा चित्रपट अमृता रावच्या करिअरमधला शेवटचा हिट चित्रपट ठरला. आता पुन्हा सूरज बडजात्यातर्फे अमृता रावला प्रेम रतन धन पायोमध्ये काम करण्याची आॅफर होती, मात्र मुख्य नायिकेची नव्हती म्हणून काम करण्यास अमृताने नकार दिला. अमृताला सोनमचा रोल मिळण्याची शक्यता होती. स्वाभाविक आहे की अमृता रावने प्रेम रतन धन पायोमध्ये काम केले असते तर, आज वर्षातला सर्वात यशस्वी चित्रपट तिच्या खात्यात जमा झाला असता आणि कदाचित तिच्या मंद करिअरला गती मिळाली असती. आता मात्र अमृता रावला हा प्रस्ताव न स्वीकारण्याच्या निर्णयाचा नक्कीच पश्चात्ताप होत असेल. हा पहिला आणि एकमेव किस्सा नाही, की एखाद्या नायिकेच्या हातातून एखादा चित्रपट निघून गेला असेल आणि तो नंतर सुपरहिट झाला असेल. दुसऱ्या मोठ्या नायिकांनीही अमृतासारखी चूक केली आहे. ऐश्वर्या रॉयने जर राजा हिंदुस्तानीमध्ये काम केले असते तर करिश्मा कपूरच्या जागी राणी हिंदुस्तानीचा टॅग तिला मिळाला असता. कुछ कुछ होता हैमध्ये शाहरूख खान आणि काजोलसोबत राणी मुखर्जीच्या जागी तिसरा अॅँगल टिष्ट्वंकल खन्नाचा असता. जर करिना कपूरने हम दे दिल चुके सनममध्ये काम करण्यासाठी होकार दिला असता तर ऐशच्या जागी सलमानसोबत तिची जोडी जमली असती. करिनालादेखील बाजीराव मस्तानीमध्ये मस्तानीच्या भूमिकेची आॅफर मिळाली होती. ज्याला तिने नकार दिला. करिनाला भन्सालींचा चित्रपट रामलीलाची देखील आॅफर होती, मात्र रणवीर सिंगची हीरोईन अखेर दीपिकाच झाली. कतरिना कैफसोबत शाहरूख खानच्या चित्रपटांचा मामलादेखील गमतीशीर आहे. दीपिकाने जब तक है जानमध्ये काम करण्यास नकार दिला आणि हा चित्रपट कॅटच्या खात्यात आला. तिकडे करिनाने चेन्नई एक्स्प्रेसमध्ये काम करण्यास नकार दिला, तर हा रोल दीपिकाला मिळाला. दीपिकाचा रणबीरसोबत हिट राहिलेल्या जवानी है दीवानी चित्रपटाची आॅफरदेखील प्रथम कॅटला दिली गेली होती. काजोलने वीरझारामध्ये काम करण्यास नकार दिला आणि ही भूमिका प्रीती झिंंटाला मिळाली होती. विद्या बालनच्या करिअरला डर्टी पिक्चरने एक यशस्वी वळण दिले. विद्याला ही संधी तेव्हा मिळाली जेव्हा कंगनाने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. तसेच जुही चावलाने जर नकार दिला नसता तर यशराजच्या दिल तो पागल हैमध्ये करिश्माचा रोल जुहीच्या नावे राहिला असता.
चित्रपट नाकारणाऱ्या नायिकांचा पश्चात्ताप
By admin | Updated: November 28, 2015 01:24 IST