अभिनेत्री तथा निर्माता अनुष्का शर्मा हिने वर्सोवा बीचवर साफसफाई करीत स्वच्छ भारत अभियानास समर्थन दिले. अनुष्काने शुक्रवारी काही फोटो शेअर केले, ज्यामध्ये ती वर्सोवा बीचवर साफसफाई करताना दिसत आहे. अनुष्काने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘काम करण्याचा आनंद उपदेशापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे... गांधीजी! स्वच्छ भारत- स्वच्छता हीच सेवा’ या महिन्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुष्काला ‘स्वच्छता ही सेवा’ याकरिता आमंत्रित केले होते. अनुष्का व्यतिरिक्त मोदी यांनी मल्याळम चित्रपट अभिनेता मोहनलाल यांनादेखील या अभियानात सहभागी होण्याचा आग्रह केला होता. त्याची सुरुवात अनुष्काने केली असून, तिने बीचवर जोरदार स्वच्छता मोहीम राबविली.
‘स्वच्छ भारत अभियाना’त महानायक अमिताभ बच्चन एक विशेष चेहरा आहेत. जे सर्वसामान्य लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्यात जनजागृती करणार आहेत. त्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा सरकारचा आवाज बनून लोकांना स्वच्छता अभियानात सहभागी होण्यासाठी आवाहन करणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून ती लोकांना स्वच्छता करण्यास प्रेरित करणार आहे.
शहरी विकास मंत्रालयाने अनुष्काची स्वच्छ भारत अभियानासाठी निवड केली आहे. अनुष्काची निवड करण्याचा एकमेव उद्देश असा की, हे अभियान तिच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचविले जावे. शिवाय अनुष्काचे व्यक्तिमत्त्व पाहता ग्रामीण भागातील महिलाही तिच्यासोबत या अभियानास जोडले जाण्याची शक्यता आहे.