प्राजक्ता चिटणीस, ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि.16- मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री पल्लवी पाटील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. पल्लवी अभिनेता संग्राम समेळसोबत लग्न करणार आहे. 1 जानेवारीला ते दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.
याविषयी पल्लवी सांगते, "आम्ही दोघे खूप वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्रमैत्रीण आहोत. प्रत्येक समस्येत आम्ही दोघे एकमेकांच्या मागे उभे राहतो. एकदा सहज आम्ही भेटलो होतो. खरे तर त्यावेळी प्रेम, लग्न या गोष्टी आमच्या डोक्यातदेखील नव्हत्या. केवळ भेटून गप्पा मारूया... एकमेकांच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे हे शेअर करूया असे आम्ही ठरवले होते. पण त्यादिवशी आमच्या दोघांच्या डोक्यात काय घंटी वाजली हे आम्हाला दोघांनाही कळले नाही. आम्ही दोघे एकमेकांना आवडायला लागलो आहे असे वाटले. संग्राम लग्न करण्यासाठी मुली पाहातच होता. पण आम्ही दोघेही लग्न करण्याच्या विरोधात होतो. पण भेटल्यानंतर आपण दोघे एकमेकांचे चांगले जोडीदार होऊ शकतो याची आम्हाला जाणीव झाली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ही गोष्ट एकमेकांच्या घरात सांगितली आणि आठच दिवसांत आमचे लग्न ठरले.
आम्ही हा निर्णय घ्यायला खूप वेळ लावला होता का असे आता आम्हाला वाटतेय. आम्ही दोघे एकमेकांसाठी खूपच परफेक्ट आहोत. एकमेकांचे गुण तर आम्हाला माहीत होते पण आता एकमेकांचे अवगुणही आम्ही स्वीकारले आहेत."