जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटकांना त्यांचा जीव गमवावा लागला. या हल्ल्यात एकूण २६ जणांचा मृत्यू झाला. घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने या कुटुंबाचा आधार हरपला आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. जगभरातून या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावरही अनेक सेलिब्रिटींनी या हल्ल्यावर पोस्ट शेअर केल्या आहेत. आता अमृता खानविलकरनेही याबाबत पोस्ट शेअर केली आहे.
अमृता सध्या परदेशात आहे. ती जपानमध्ये सुट्ट्या घालवत आहे. तिथला एक फोटो शेअर करत ती म्हणते, "तुम्ही कुठे असलात तरीही तुम्ही कधीच घरापासून दूर नसता...या दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी प्राण गमावले आणि ज्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. त्या सर्वांसाठी प्रार्थना करत आहे", असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या या हल्ल्यात दोन स्थानिक दहशतवाद्यांचादेखील समावेश होता. या हल्ल्यात सहभाग असलेल्या आसिफ शेख आणि आदिल या दोन स्थानिक दहशतवाद्यांची घरं सुरक्षा दलांनी आज उद्ध्वस्त केली. लष्कराने जम्मू काश्मीरमधील दक्षिण काश्मीर भागात असलेल्या अनंतनाग आणि पुलवामा भागात ही कारवाई केली आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राइक करत त्यांची कोंडी केली आहे. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार असल्याचंही भारत सरकराने म्हटलं आहे.