प्रफुल्ल गायकवाड, ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - दशरथ पुजारी यांचा जन्म ऑगस्ट ३०, इ.स. १९३० रोजी बडोद्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईत गिरगावातील युनियन हायस्कूलमध्ये झाले. त्यांचे वडील वैद्यकीय पेशात असल्यामुळे पुजारी कुटुंबीयांचे सोलापूर, बार्शी, पंढरपूरअशा विविध ठिकाणी वास्तव्य घडले. बार्शीच्या गोपाळराव भातंब्रेकर गुरुजींकडून दशरथ पुजारी यांनी संगीताचे व गायनाचे धडे घेतले. वयाच्या अवघ्या १८ वर्षांपासूनच त्यांनी संगीत दिग्दर्शनातील कारकीर्दीस सुरुवात केली.
दशरथ पुजारी यानी आपल्या प्रदीर्घ संगीत कारकीर्दीत मंगेश पाडगावकर, रमेश आणावकर, शांताराम नांदगावकर,सुधांशु, योगेश्वर अभ्यंकर, मधुकर जोशी यांसारख्या गीतकारांच्या गाण्यांना चाली बांधल्या. 'झिमझिम झरती श्रावणधारा', 'अशीच अमुची आई असती', 'चल ऊठ रे मुकुंदा', 'केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा', 'मृदुल करांनी छेडित तारा' इत्यादी गाणी त्यांच्या अतिशय गाजलेल्या गाण्यांपैकी आहेत.
त्यांनी 'अजून त्या झुडपांच्या मागे' हे आत्मचरित्रपर पुस्तकही लिहिले आहे.१३ एप्रिल २००८ रोजी मुंबईत कर्करोगाने त्यांचा मृत्यू झाला.