अभिनेता सुबोध भावेने नेहमीच चित्रपटात विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. सुबोधचे अलिकडचे चित्रपट जर आपण पाहिले तर त्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळते. म्हणुनच कि काय या सर्व सुवर्ण आठवणी साठवण्याची लहर सुबोधला आली असावी. सुबोधने त्याच्या चार चित्रपटातील प्रवासावर एक पुस्तक लिहिले आहे. लवकरच या पुस्ताकाचे प्रकाशन होणार असल्याचे सुबोधने सांगितले. या पुस्तकाविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना सुबोध सांगतो, ''घे छंद या नावाचे पुस्तक मी नुकतेच लिहिले आहे. ते सर्वांसाठी लवकरच उपलब्ध होईल. खरेतर मी काही लेखक नाही. पण मला माझ्या शाळेतील एका जुन्या मित्राने हे पुस्तक लिहिण्यासाठी भाग पाडले.'' त्याच्या आग्रहाखातरच मी पुस्तक लिहायला घेतले होते. गेल्या काही दिवसात तुझ्या आयुष्यात महत्त्वपूर्ण चार-पाच गोष्टी घडल्या आहेत. त्या तू कुठेतरी लिहुन ठेवायला पाहिजेस. आता कट्यारला पण एक वर्ष पूर्ण होईल आणि तुझा वाढदिवस पण जवळ आला आहे असे त्याने मला ठणकावून सांगितले होते. त्याच्याच आग्रहाखातर 'घे छंद' हे पुस्तक मी लिहिले. माझ्या आयुष्यातील कट्यार काळजात घुसली हे नाटक ते कट्यार काळजात घुसली हा चित्रपट या दरम्यानचा प्रवास पुस्तकात मांडण्यात आला आहे. कलाकार म्हणून मी या दरम्यान कसा घडलो, काय शिकलो, काय अनुभवलो या सर्वच गोष्टी मी उतरविल्या आहेत. सप्टेंबरमध्ये मी हे पुस्तक लिहायला घेतले होते. आता प्रेक्षकांसाठी ते लवकरच प्रकाशित होईल.
सुबोध कोणासाठी बनला लेखक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 16:56 IST