सिध्दार्थ म्हणतो, गेला उडत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 13:22 IST
Exculsive - बेनझीर जमादार दे धक्का, जत्रा, टाइम प्लीज यांसारख्या सुपरहीट मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा ...
सिध्दार्थ म्हणतो, गेला उडत
Exculsive - बेनझीर जमादार दे धक्का, जत्रा, टाइम प्लीज यांसारख्या सुपरहीट मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा अभिनेता सिध्दार्थ जाधव हा तीन वर्षानंतर रंगभूमीकडे वळाला आहे. तसेच दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासोबत तो थेट तेरा वर्षानंतर गेला उडत हे नाटक करत आहे. आज या नाटकाचे २५ प्रयोग यशस्वी झाले आहेत. याच नाटकाविषयी अभिनेता सिध्दार्थ जाधव याने लोकमत सीएनएक्सने साधलेला संवाद.१. गेला उडत या नाटकाचे नुकतेच यशस्वी २५ प्रयोग झाले याबद्दल काय सांगशील?- गेला उडत या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे संपूर्ण टीमच खूप आनंदित आहे. या नाटकाचे हे यश पाहता, दिवस-रात्र या नाटकाचे रियसल करत असतानाचा तो सगळा कालावधी आठवतो. म्हणतात ना, मेहनत करा, यश हे नक्की मिळेल त्याचेच हे सुंदर उदाहरण आहे. तसेच या नाटकाचे सर्व यश आहे फक्त एका माणसाचे ते म्हणजे या नाटकचे दिग्दर्शक केदार शिंदे. २. या नाटकातील तुझी भूमिका काय आहे?- या नाटकमध्ये सुपरहीरो सिंड्रोमचा बळी असलेल्या मारुतात्मज या तरुणाची भूमिका मी साकारलेली आहे. मारूतात्मज एक साधा भोळा मुलगा आहे. पण त्याच्या आईने त्याला सांगितले असते की, प्रत्येक माणसात एक सुपरहिरो असतो. त्यामुळे तो त्याच विश्वात जगणारा हा मुलगा आहे. तसेच तो सतत सुपरमॅनच्या पेहरावात वावरत असताना काही ना काही घोळ करून घरच्या मंडळीना गोचीत आणतो. पण एक दिवस त्याला जाणिव होते की, माणसांमध्ये सुपरपॉवर नसली तरी तो सुपरहिरो असतो. अशी ही मस्त गोष्ट आहे. ३. रंगभूमीवर मोठया कालावधीनंतरचा अनुभव कसा वाटला? - खूप छान वाटत आहे. तीन वर्षानंतर पुन्हा रंगभूमीकडे पाहताना तितकीच मजा येत आहे. तसेच केदार सरांसोबत तेरा वर्षापूर्वी लोच्या झाला रे.. हे नाटक केले होते. आता एवढया वर्षानंतर त्यांच्यासोबत गेला उडत हे नाटक करत आहे. या गोष्टीच आनंद आहे. तसेच रंगभूमीवर वेगवेगळया पद्धतीची नाटकं येत आहेत त्यात गेला उडत या नाटकाने स्वत:च स्थान निर्माण करण्यात यश मिळविल्याचा अधिक आनंद होत आहे. ४. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासोबत तेरा वर्षानंतर काम करत आहे, त्याविषयी काय सांगेल?- केदार सर हे प्रत्येक नाटक एकदम ताकदवान व सकारात्मकरीत्या प्रेक्षकांसमोर मांडतात. लोच्या झाला रे, दामोदर पंत हे उत्तम उदाहरण आहे. गेला उडत या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी माझ्याबाबतील सर्व सकारात्मक गोष्टी नाटकांतून दाखविल्या आहेत. तसेच समीक्षक व प्रेक्षकांचे रिव्हु पाहून हे नाटक यशस्वी झालेआहे असे वाटते. यामागे पूर्ण टीम व प्रसाद कांबळी यांचा हातभार आहे. ५. रंगभूमीवरील आदिमानव, सूपरमॅन अशा हटक्या भूमिकेविषयी काय वाटतं?- प्रत्येक काम हे वेगळं असतं. सुपरमॅन म्हटलं तर हा रंगभूमीवर कसं उडणार हा प्रश्न पडतो. पण या सर्व गोष्टी केदार सरांनी रंगभूमीवर व्यवस्थित मांडल्या आहेत. तसेच आम्ही थिएटर कलाकार आहोत. एकांकितासारख्या स्पर्धेतून पुढे आलो आहोत. त्यामुळे रंगभूमीवर काम करणे ही आमच्यासाठी वेगळी गोष्ट असते. ६. चित्रपट आणि रंगभूमी यातील काही फरक?- माझ्यासाठी रंगभूमी व चित्रपट दोन्ही कर्न्फेटेबल आहेत. तसेच रंगभूमीमुळे आम्हाला चित्रपट मिळाले आहेत. याच रंगभूमीमुळे आम्ही स्वत:ला प्रुप केले आहेत. त्यामुळे रंगभूमी सोडणे हा विचार ही करू शकत नाही. ७. गेला उडत नाटकाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयोग करणार का?- जगभरात नाटकाचे प्रयोग होतात. तेथील स्थानिकांना नाटक आवडले तर ते तशी मागणी ही करतात. पाहूयात तशी संधी आम्हाला मिळाली तर नक्कीच जाऊ. सध्या आम्ही महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हसविण्याचा प्रयत्न करतो. तसेच जे काही जगभरातून मागणी येते ती प्रेक्षकांच्या दाद असल्यामुळेच येते. शेवटी बाहेर पडणारा पाऊस व आतमधला हास्यांचा पाऊस या दोन्ही गोष्टी आमच्यासाठी खूप चांगल्या व महत्वाच्या आहेत.७. तूला या नाटकासाठी बरेच पुरस्कार मिळाले?- हो. पारितोषिके, समिक्षकांची दाद व प्रेक्षकांचा आशिर्वाद या तिन्ही गोष्टींमुळे गेला उडत हे नाटक यशस्वी झालं आहे. कारण पुरस्कार हीच गोष्ट तुम्हाला कामाबद्दलची यशाची पावती देते.