अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) मालिका, सिनेमांमधून लोकप्रिय झाली. मात्र ती राज्यशास्त्राचाही अभ्यास करत आहे हे खूप कमी जणांना माहित आहे. तसंच सायलीला खऱ्या आयुष्यात राजकारणात येऊन काम करण्याची इच्छा आहे. नुकतीच तिने ती जाहीरपणे बोलूनही दाखवली आहे. सायली सध्या मनसेच्या चित्रपट सेनेची उपाध्यक्ष आहे. राज ठाकरेंच्या विचारांचा तिच्यावर प्रभाव असल्याचंही तिने सांगितलं.
'सुमन म्युझिक पॉडकास्ट'ला दिलेल्या मुलाखतीत सायली संजीव म्हणाली, "हो, मला सक्रीय राजकारणात यायची इच्छा आहे. मला खरंच असं वाटतं की एक ध्येय ठेवलं पाहिजे. जेव्हा मी सक्रीय राजकारणात येईन तेव्हाच्या गोष्टी कदाचित बदलल्या असतील. त्यामुळे आजच्या समस्यांकडे लक्ष ठेवून मी ध्येय ठरवलं तरी तेव्हा त्याची कदाचित गरजच नसेल. मला शाळेत असल्यापासून वाटायचं की समाजात अमुक घडतं, तमुक घडतंय. मग आपली चिडचिड होते. हा रस्ता खराब, पाणी नाही, वीज नाही, काही गावांना जोडणारे रस्तेच नाहीयेत, तेव्हा मला वाटायचं की आपण आजूबाजूच्या गोष्टींबद्दल सतत तक्रारी करण्यापेक्षा हे सगळं करण्यात नक्की काय मेहनत असते यातून आपणही एकदा जाऊन बघूया फक्त शासनाला नावं ठेवण्यापेक्षा ही कामं करण्यात नक्की काय आव्हानं, अडचणी असतात हे बघितलं पाहिजे."
ती पुढे म्हणाली, "करिअरच्या दृष्टीने सुद्धा राजकारण हे उत्तम करिअर आहे. तरुणांसाठी तर हे खूप चांगलं आहे. आपल्याला आपलं शहर जसं हवं आहे तसं करायचं असेल तर यात तरुणांनी उतरणं आवश्यक आहे. माझं अभिनय पॅशन आहेच पण माझं दुसरं पॅशन राजकारण आहे."
राज ठाकरेंचे विचार आवडतात
"मी दहावीत असताना राज ठाकरेंची पहिली सभा पाहिली. त्यांच्या विचारसरणीचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. आजही तो जाणवतो. तसंच त्यांचा मराठीचा आग्रह. हे माझ्यासाठी अत्यंत जवळचं होतं. मी अभिमानाने सांगते की मी सध्या एम ए राज्यशास्त्राचा अभ्यास पूर्ण मराठीतून करत आहे. इंग्रजीतून नाही. तसंच राज ठाकरेंचं वाचन, त्यांना माहित असलेल्या प्रत्येक गोष्टी, त्यांचा सगळ्या गोष्टींचा अभ्यास, सिनेमा, खेळ हे सगळंच प्रभाव पाडणारं होतं."