Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजेश मापुस्कर सांगतात, लेखन परिपूर्ण होण्यात संगीताचा मोठा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2017 11:00 IST

पुणे आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदा हे १५ वे वर्ष आहे. या महोत्सवात विविध देशातील चित्रपट दाखविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ...

पुणे आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदा हे १५ वे वर्ष आहे. या महोत्सवात विविध देशातील चित्रपट दाखविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे व्याख्याने, चर्चासत्रेदेखील भरविण्यात येणार आहे. हा महोत्सव १२ ते १९ जानेवारीपर्यत रंगणार आहे. या महोत्सवाची सुरूवातच मराठी इंडस्ट्रीचे दिग्दर्शक राजेश मापूसकर यांच्या चर्चासत्राने करण्यात आली. राजेश मापुसकर यांचा नुकताच व्हेंटिलेटर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठया प्रमाणावर पसंती मिळाली आहे.               या महोत्सवाच्या चर्चासत्रात दिग्दर्शक राजेश मापुसकर सांगतात, ''माझे लेखन परिपूर्ण होण्याच्या कामात संगीताचा वाटा फार महत्वाचा आहे. कारण संगीतातूनच मला 'कथेचा मूड' कळत जातो आणि त्यातून निर्माण झालेली संहिता दिग्दर्शक या नात्याने पडद्यावर उतरविणे सोपे जात असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.                पंधराव्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पर्धात्मक मराठी चित्रपटांमध्ये 'व्हेंटिलेटर' या चित्रपटाचा समावेश असून त्यानिमित दादासाहेब फाळके पॅव्हेलियनमधील ओमपुरी रंगमंच येथे 'व्हेंटिलेटर' या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक राजेश मापुस्कर आणि प्रमुख कलाकार जितेंद्र जोशी व सतीश आळेकर यांच्याशी श्रीरंग गोडबोले यांनी संवाद साधला.                   आपल्या चित्रपट कारकिदीर्चा थोडक्यात आढावा घेताना मापुस्कर पुढे म्हणाले की, जगण्यातील वास्तव पडद्यावर दाखविण्याची माझी नेहमीच इच्छा असते. प्रख्यात दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे चित्रपट क्षेत्रात काहीतरी करून दाखवता आले. 'फेरारी की सवारी' चित्रपटाला यश मिळाल्यानंतर मला मराठी चित्रपट करण्याची इच्छा होतीच कारण 'मराठी चित्रपटाला सध्या जो प्लॅटफॉर्म मिळाला आहे त्यामध्ये 'हृदयाची गोष्ट' सांगितली तर ती सहज चालू शकते असे मला वाटले आणि त्यातूनच 'व्हेंटिलेटर'ची निर्मिती झाली. या चित्रपटातील अनेक कलाकारांनी त्यांचे स्वत:चे काम करताना मला जी ऊर्जा दिली त्याचा चित्रपटाच्या यशावर चांगला परिणाम झाला असेही त्यांनी सांगितले.