Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगान्त या नाट्यत्रयीचे केवळ ११ प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 10:05 IST

‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगान्त’ ही महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित गाजलेली नाट्यत्रयी! या नाट्यत्रयीतून भारतीय संस्कृतीची ...

‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगान्त’ ही महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित गाजलेली नाट्यत्रयी! या नाट्यत्रयीतून भारतीय संस्कृतीची अनेक रूपं व्यक्त होतात. यातले ‘युगान्त’ हे तिसरे नाटक दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी रसिकांसाठी १ ऑक्टोबरला घेऊन येणार आहेत. जीवनानुभव देणाऱ्या या तीनही नाटकांचा सलग ९ तासांचा अविस्मरणीय नाट्यानुभव यानिमित्ताने प्रेक्षकांना लवकरच घेता येईल. यासंबधी अधिक माहिती देण्यासाठी नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी बोलताना दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, मराठी व्यावसायिक रंगभूमीवर ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ करत असताना माझ्यावर थोडसे दडपण होते. हे नाटक जरी चांगले असले तरी आताच्या काळात चालेल का? असा प्रश्न माझ्या मनात होता. पण ‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘मग्न तळ्याकाठी’ला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून लक्षात आलं की, पस्तीस वर्षांपूर्वी एका नाटककाराने लिहिलेलं, महाराष्ट्रातल्या एका कुटुंबात घडणारे हे नाटक आजही प्रेक्षकांना आवडत आहे. याचा अर्थ ते काळाच्या कसोटीवर उतरलेले नाटक आहे. ‘युगान्त’ आणल्यानंतर हे नाट्यवर्तुळ पूर्ण होईल या उद्देशाने ही ‘नाट्यत्रयी’ प्रेक्षकांसाठी रंगमंचावर आणत आहोत. मराठी व्यावसायिक रंगभूमीवर अशी ‘नाट्यत्रयी’ प्रथमच सादर होत आहे हे विशेष. म्हणूनच महाराष्ट्राची सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास मांडणारी ही अभिजात नाट्यकृती सादर होणे ही ऐतिहासिक गोष्ट असून ती महाराष्ट्रभर पोहचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. या अभिजात कलाकृतीसाठी कलाकारांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी यावेळी कलाकारांचे आभार मानले. तसेच याप्रसंगी उपस्थितीत सर्वच कलावंतांनी आपली मनोगतं, अनुभव यावेळी कथन केले. तसचं चांगल्या प्रकल्पाचा भाग होता आले याचा आनंदही व्यक्त केला.या ‘नाट्यत्रयी’चा पहिलावहिला प्रयोग रविवार १ ऑक्टोबर २०१७ ला रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे रंगणार आहे. विशेष म्हणजे या ‘नाट्यत्रयी’चे मोजकेच ११ प्रयोग होणार असून ते दर रविवारी सादर होतील. बदलती एकत्र कुटुंब पद्धती, बदलता काळ, बदलते नातेसंबंध, भावभावनांचा भव्यपट एकाच दिवशी, एकाच थिएटरमध्ये एकापाठोपाठ बघणं म्हणजे नाट्यरसिकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. या नाटकाची निर्मिती ‘जिगीषा’ व ‘अष्टविनायक’ यांची आहे. लेखन महेश एलकुंचवार यांचे असून दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांचे आहे.निवेदिता सराफ, भारती पाटील, वैभव मांगले, प्रसाद ओक, पौर्णिमा मनोहर, प्रतिमा जोशी, नेहा जोशी, अजिंक्य ननावरे, दीपक कदम, विनिता शिंदे, चिन्मय मांडलेकर, सिद्धार्थ चांदेकर, पूर्वा पवार, राम दौंड, आणि बालकलाकार स्वानंद शेळके या कलाकारांच्या यात भूमिका आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीत आनंद मोडक, राहुल रानडे यांचे आहे. Also Read : चंद्रकांत कुलकर्णी, कांचन सोनटक्के यांचा 'चैत्र चाहूल' पुरस्काराने गौरव