शिक्षणाला वयाची मर्यादा नसते असे म्हणतात. प्रत्येकी व्यक्ती हा कोणत्याही वयात शिक्षण घेवू शकतो. अशीच बरीच उदाहरणे समाजात आपल्याला पाहायला मिळतात. एवढंच नाही तर वयाच्या ५० व्या वर्षी देखील दहावी पास झाल्याचे आपण ऐकले आहेत. शिकण्याची जिद्द असली की, तर त्याला वयाचे बंधन नसते. अशीच शिकण्याची जिद्द प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री निशिगंधा वाड यांची असल्याचे त्यांनी लोकमत सीएनएक्सला सांगितले आहे. निशिगंधा म्हणाल्या, ''२०१९ पर्यंत मला पीएचडी करण्याचा मानस आहे. शांताबाई शेळके यांच्या स्वातंत्र्य कवितांवरचा ग्रंथ पूर्ण करायचा आहे. यापूर्वीदेखील मी २००३ मध्ये इतिहास तर २०१३ मध्ये महिला सक्षमीकरण याविषयात पीएचडी पूर्ण केली आहे. खरे सांगू का मी दहावीला बोर्डात पहिल्या पन्नासमध्ये होते. तर बारावीमध्ये बोर्डात तिसरा क्रमांक मिळविला होता. त्यामुळे मला शिक्षणाची साथ ही कधीच सोडायची नव्हती. हे सर्व केवळ देवामुळे आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले आहे.'' माझी मुलगी ईश्वरीला देखील दहावीला ९४ टक्के होते. मला तिचे ही खूप कौतूक वाटते. त्याचबरोबर योग्य पध्दतीने मुलांना आपण विचार करण्यास प्रेरक ठरलो आहोत याचा अधिक अभिमान वाटतो. तसेच हल्ली ही शिक्षणाची व्याख्या बदलली आहे. कारण आजचे शिक्षण हे पुस्तकी ज्ञानावर नसते. तर हल्लीची मुळे ही थेट कामाचा अनुभव घेत असतात. त्यामुळे या मुलांविषयी देखील कौतूक वाटते. निशिगंधा यांनी शेजारी शेजारी, एकापेक्षा एक, वाजवा रे वाजवा, सासर माहेर अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
आता कोणत्या विषयात निशिगंधा करणार पीएचडी ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 11:43 IST