Join us  

ना मंडप ना शाही थाट... घरातच सप्तपदी अन् फक्त २० पाहुणे, साधेपणानं लग्न करण्यामागचं अभिनेत्रीनं सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 5:56 PM

अभिनेत्रीच्या लग्नाला फक्त २० ते २५ लोक उपस्थित होते.

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि मालिकांमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे नेहा जोशी (Neha Joshi). मराठीनंतर ती हिंदी इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ती अजय देवगणच्या 'दृश्यम २'मध्येही झळकली होती. तिने या सिनेमात जॅनिनची भूमिका केली होती. या चित्रपटानंतर ती 'दुसरी मां' या हिंदी मालिकेत मुख्य भूमिकेत झळकते आहे आणि या मालिकेतील तिच्या कामाचे खूप कौतुक होताना दिसत आहे. पण तुम्हाला माहित आहे का, मागील वर्षी नेहाने तिचं लग्न कोणताही गाजावाजा न करत साधेपणाने केले होते. नुकतेच तिने यावर भाष्य केले आहे.

नेहा जोशीने मागील वर्षी १६ ऑगस्टला अभिनेता ओंकार कुलकुर्णीशी लग्न केले. त्यानंतर २१ ऑगस्टपासून ते दोघेही शूटिंगमध्ये व्यग्र झाले. नेहा जोशी आपल्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयावर अगदी स्पष्ट असते. त्यामुळेच तिने अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत घरातच लग्न केले होते. लग्नानंतरही ती लगेचच कामावरदेखील रुजू झाली होती. विशेष बाब म्हणजे तिने लग्नात मंगळसूत्राशिवाय एकही दागिना विकत घेतला नव्हता. यामागचे कारणही तिने नवभारत टाइम्सशी बोलताना सांगितले. ती म्हणाली की, 'माझे लग्न अगदी साध्या पद्धतीने झाले. लग्नाला फक्त २० ते २५ लोक आले होते आणि आम्ही घरातच लग्न केले होते. लग्नात मला फक्त इतक्याच लोकांची गरज आहे असे वाटले आणि मी तेवढ्यांनाच बोलावले.

लग्नात दागिने घेतलेच नाहीनेहा पुढे म्हणाली की, मंगळसूत्राव्यतिरिक्त मी लग्नासाठी इतर कोणतेही दागिने विकत घेतले नाहीत. लग्नात दागिने खरेदी करणाऱ्यांबद्दल मला काहीही बोलायचे नाही. जे खरेदी करतात त्यांच्यासाठी ती चांगली बाब आहे. जे सोन्याची खरेदी करत नाहीत त्यांच्यावर जबरदस्ती करू नये. खरेच, लग्न हा उत्सवाचा एक प्रसंग आहे. जुन्या काळात सण आणि उत्सवांना कमी संधी होत्या, पण सध्या प्रत्येक छोट्या- मोठ्या गोष्टींचा उत्सव साजरा केला जातो. आता परिस्थिती बदलली आहे त्यामुळे आपणही बदलले पाहिजे.

टॅग्स :नेहा जोशी