Join us

गणेश तोवर आणि उल्का गुप्ता यांच्या ​‘ओढ’ चित्रपटाचे म्युझिक लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 16:06 IST

आजच्या तरुणाईला आवडतील असे कथाविषय मराठी चित्रपटांमध्ये आवर्जून दिसू लागले आहेत. मैत्रीचे वेगळे रूप दर्शवणारा ‘ओढ’ हा चित्रपट १९ ...

आजच्या तरुणाईला आवडतील असे कथाविषय मराठी चित्रपटांमध्ये आवर्जून दिसू लागले आहेत. मैत्रीचे वेगळे रूप दर्शवणारा ‘ओढ’ हा चित्रपट १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या मराठी चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचा ट्रेलर आणि गीताची झलक दाखवण्यात आली. कलाकारांच्या रंगतदार लाइव्ह परफॉर्मन्सने या सोहळ्यात अधिकच रंग भरले. सोनाली एन्टरटेन्मेंट हाऊसची प्रस्तुती तसंच एस. आर. तोवर यांची निर्मिती असलेल्या ‘ओढ’ मैत्रीतील अव्यक्त भावनाचे दिग्दर्शन नागेश दरक आणि एस. आर. तोवर यांनी केले आहे. तरुणाईच्या ओठावर सहज रुळतील अशी वेगवेगळ्या जॉनरची चार गीते यात असून हा सुरेल नजराणा प्रेक्षकांना निश्चित आवडेल असा विश्वास निर्मात्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. तसेच उपस्थित सर्व कलाकारांनी निर्मात्यांनी दिलेल्या संधीबद्दल त्यांचे आभार मानले.संजाली रोडे लिखित ‘निरंतर राहू दे’ हे गाणं स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल यांनी गायले आहे. कौतुक शिरोडकर यांचे ‘नाचू बिनधास्त’ हे धमाकेदार गाणं आदर्श शिंदे, वैशाली माडे यांनी स्वरबद्ध केले आहे. ‘ना जाने क्या हुआ है’ हे अभय इनामदार यांनी लिहिलेलं गाणं रोहित राऊत आणि आनंदी जोशी यांनी गायले आहे. ‘जो दिल से किसी को’ हे सुफी साँग कुकू प्रभास यांनी लिहिले असून जावेद अली यांनी ते आपल्या आर्त स्वरात गायले आहे. संगीतकार प्रवीण कुवर यांचा संगीतसाज या गीतांना लाभला आहे.मैत्री, प्रेम दर्शवणारी ‘ओढ’ मैत्रीच्या नात्याला कोणत्या वळणावर घेऊन जाणार? याची रंजक कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. गणेश तोवर आणि उल्का गुप्ता ही नवी जोडी या चित्रपटातून आपल्या समोर येणार आहे. सोबत मोहन जोशी, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, शशिकांत केरकर, जयवंत भालेकर, राहुल चिटनाळे, आदित्य आळणे, सचिन चौबे, शीतल गायकवाड, तेजस्विनी खताळ, मृणाल कुलकर्णी आदी कलाकारांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. कथा व पटकथा दिनेश सिंग ठाकूर यांनी लिहिली असून, त्यांनीच गणेश कदम आणि दर्शन सराग यांच्यासोबत संवादलेखन केलं आहे. Also Read : उल्का गुप्ता सांगतेय, छोट्या पडद्यावर काळ्या-गोऱ्याचा भेदभाव केला जातो