मनाचा ठाव घेणारा कौटुंबिक चित्रपट ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 15:22 IST
स्त्रीला तिच्या अस्तित्वाची आणि क्षमतेची जाणीव करून देणारा ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झालाय. महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश ...
मनाचा ठाव घेणारा कौटुंबिक चित्रपट ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’
स्त्रीला तिच्या अस्तित्वाची आणि क्षमतेची जाणीव करून देणारा ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झालाय. महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहचवून सकारात्मक बदल घडवून आणण्याचा उत्तम प्रयत्न दिग्दर्शक भानुदास व्यवहारे यांनी या चित्रपटातून केला आहे. ‘जयलक्ष्मी वैष्णवी फिल्म प्रोडक्शन’ यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती भानुदास व्यवहारे व दत्तात्रेय मोहिते यांची आहे. महाराष्ट्रातील १०० हून अधिक चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. स्त्रियांच्या भावविश्वात घडत राहणाऱ्या छोट्यामोठ्या गोष्टींची दोलायमान गुंफण दाखवतानाच वैवाहिक आयुष्यातील समस्या, मुला-मुलींच्या अपेक्षा, त्यांच्या आई-वडिलांचे दृष्टिकोन यासोबत समाजाची मानसिकता या सगळ्यांवर हा चित्रपट भाष्य करतो. हृदयस्पर्शी कथानक, कलाकारांचा उत्तम अभिनय श्रवणीय गाणी या सगळ्यामुळे हा चित्रपट मनोरंजक झाला आहे.वयात आलेल्या मुला-मुलींचे लग्न म्हणजे घरच्यांसाठी काळजीचा विषय असतो; विशेषतः मुलीचं लग्न हा अंमळ जास्तच महत्त्वाचा असतो. ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ ही कथा आहे वर्षा आणि आकाश या तरुण जोडप्याची. एकमेकांच्या पसंतीने लग्न ठरलेल्या या दोघांच्या आयुष्याला लग्नानंतर अचानक कलाटणी मिळते. या कलाटणी नंतर वर्षा आणि आकाशाचे आयुष्य कोणते वळण घेतं याची हृदयस्पर्शी कथा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. वैवाहिक आयुष्यातील समस्या, मुला-मुलींच्या अपेक्षा, त्यांच्या आई-वडिलांचे दृष्टिकोन यासोबत समाजाची मानसिकता या सगळ्यांवर चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. वेगवेगळ्या धाटणीची पाच गीते या चित्रपटात आहेत. भानुदास व्यवहारे यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गीतांना संगीतकार एँग्नेल रोमन यांचा संगीतसाज लाभला आहे. वैशाली माडे, सुहास सावंत, प्रसन्नजित कोसंबी यांनी यातील गीते गायली आहेत. संगीत संयोजन विलास गुरव यांचे आहे. विक्रम गोखले, सुरेश विश्वकर्मा, यतिन कार्येकर, सुनील गोडबोले, भक्ती चव्हाण, श्वेता खरात, सुवर्णा काळे, रितेश नगराले, राहूल पाटील, हर्षा शर्मा, अर्जुन जाधव, शंकर सूर्यवंशी हे कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाचे सहनिर्माते अभय भंडारी, प्रमोद वेदपाठक, सुभाष चव्हाण, औदुंबर व्यवहारे असून सहदिग्दर्शन निशांत आडगळे यांनी केले आहे. कथा,पटकथा,संवाद भानुदास व्यवहारे यांचे आहेत. छायांकन सिद्धेश मोरे यांनी तर संकलन माधव शिरसाट यांचे आहे..