बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरने केला वाक्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च,13 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 12:44 IST
सध्या गेल्या काही महिन्यापासून अनेक बॉलिवूड अभिनेते -अभिनेत्री मराठी सिनेमाचे प्रमोशन करताना दिसतात.बॉलिवूड सेलिब्रेटींचे मराठी सिनेमांना मिळणारे प्रेम पाहता ...
बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरने केला वाक्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च,13 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
सध्या गेल्या काही महिन्यापासून अनेक बॉलिवूड अभिनेते -अभिनेत्री मराठी सिनेमाचे प्रमोशन करताना दिसतात.बॉलिवूड सेलिब्रेटींचे मराठी सिनेमांना मिळणारे प्रेम पाहता अनेक बॉलिवूड स्टार स्वतः सोशल मीडियावरून ट्रेलर शेअर करत प्रमोशन करताना पाहायला मिळत. आता यांत तुषार कपूरनेही पुढाकार घेतला आहे. वाक्या या मराठी सिनेमाला तुषार कपूरने सपोर्ट केले आहे. तुषारने सिनेमाचे ट्रेलर लॉन्च करत रसिकांना सिनेमा पाहण्याचे आवाहन केले आहे. वास्तववादी सिनेमे प्रेक्षकांशी अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट होतात हे लक्षात घेत सामाजिक भान जपणाऱ्या मराठी चित्रपटांची निर्मिती अलीकडच्या काळात सातत्याने होत आहे. भटक्या-विमुक्तांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्या वेदना, त्यांचे प्रश्न समाजाने आधी समजून घेतले पाहिजेत या उद्देशाने वाक्या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. भटक्या समाजातील वंचिताना आपण आजही मुख्य प्रवाहात आणू शकलो नाही हे वास्तव लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक दिपक कदम यांनी वाक्या या चित्रपटातून केला आहे. माऊली निर्मित व आर.पी प्रोडक्शन प्रस्तुत वाक्या येत्या १३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.पोतराजाच्या जीवनावर या चित्रपटाचे कथानक बेतलेले आहे. विकासापासून दूर राहिलेला हा समाज आजही फार बदललेला नाही. वंशपरांपरगत चालत आलेल्या रूढीपरंपरा आणि अंधश्रध्दा यांच्या दलदलीतून बाहेर पडणे त्यांना आजही शक्य झालेले नाही. या सर्व परिस्थितीला सामोरे जात यातून बाहेर पडण्याचा कसोशीने प्रयत्न करणाऱ्या पोतराजाच्या संघर्षाची कहाणी वाक्या चित्रपट मांडतो.अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये वाक्या चित्रपटाने आपली मोहोर उमटवली आहे. या चित्रपटामध्ये पोतराजची भूमिका ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी तर घुम्या हे पात्र अभिनेता अभिजित कुलकर्णी याने साकारले आहे. या दोघांसोबत किशोरी शहाणे, प्रेमा किरण, गणेश यादव, प्रियांका ज्ञानलक्ष्मी यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा-पटकथा दिपक यांची असून संवाद अभिजीत कुलकर्णी व प्रियांका ज्ञानलक्ष्मी यांचे आहेत. चित्रपटाची गीते बिपिन धायगुडे यांनी लिहिली असून संगीत देव आशिष यांचे आहे. छायांकन त्रिलोक चौधरी तर संकलन विनोद चौरसिया यांचं आहे. नृत्यदिग्दर्शन अनिल सुतार, महेश चव्हाण यांनी केले असून कलादिग्दर्शन मधु कांबळे यांचं आहे. राजेंद्र पडोळे व दिपक कदम चित्रपटाचे निर्माते असून कार्यकारी निर्माते विनोद कुमार बरई आहेत. १३ ऑक्टोबरला वाक्या सर्वत्र प्रदर्शित होईल.