Join us

नाटक रंगात आलेलं... पण अचानक भरत जाधव चिडले, रंगमंचावर नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 10:50 IST

कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात नेमकं काय घडलं?

Bharat JadhavShrimant Damodar Pant Natak: आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारे मराठी रंगभूमीतील प्रसिद्ध अभिनेते म्हणजे भरत जाधव. सिनेमांशिवाय अभिनेते भरत जाधव यांनी आजवर विविध नाटकांमधून प्रेक्षकांना हसवले आहे. 'श्रीमंत दामोदरपंत' (Shrimant Damodar Pant) हे नाटक तर अनेकांच्या आवडीचे आहे. या नाटकाच्या अनेक प्रयोगांना हाऊसफुल्लचे बोर्ड झळकले असून देश-विदेशातही अनेक प्रयोग यशस्वीरीत्या पार पडले आहे. गेल्या रविवारी कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात (Kalyan Acharya Atre Rangmandir) 'श्रीमंत दामोदरपंत' नाटकाचा झाला. नाटक रंगात आलेलं असताना अचानकच अभिनेता भरत यांनी नाटक मध्येच थांबवलं. 

'श्रीमंत दामोदरपंत' या लोकप्रिय नाटकाचा प्रयोग रविवारी रंगात आला होता. नाटक सुरू होऊन जवळपास तासाभराचा वेळ झाला असताना रंगमंचावरील प्रखर प्रकाशझोताच्या दिशेने हजारो कीटक आकर्षित झाले. हे कीटक इतक्या प्रमाणात आले की कलाकारांच्या हालचालींवर त्याचा परिणाम होऊ लागला. भरत जाधव यांना रंगमंचावर काम करताना त्रास होऊ लागला.  यामुळे शेवटी त्यांनी नाटक थांबवण्याचा निर्णय घेतला.

भरत जाधव यांनी प्रेक्षकांना शांतपणे परिस्थिती समजावून सांगितलं आणि काही वेळासाठी नाटक थांबवण्यात आलं. रंगमंचावर कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली आणि कीटक कमी होईपर्यंत नाटक थांबण्यात आलं. काही वेळानंतर परिस्थिती नियंत्रणात येताच नाटक पुन्हा सुरू करण्यात आलं. या सगळ्या प्रसंगानंतरही प्रेक्षकांनी संयम आणि समजूतदारपणा दाखवत कलाकारांना भरभरून दाद दिली. नाटक पुन्हा रंगात आल्यावर प्रेक्षकांनी त्याचा मनमुराद आनंद लुटला.

दरम्यान, नाट्यगृहातील गैरसोयींमुळे कलावंत आणि प्रेक्षकांचा अनेकदा रसभंग होतो. यासंदर्भात अनेक कलावंतांनीही वेळोवेळी नाराजी व्यक्त केली असून, नाट्यगृहांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :भरत जाधवकल्याण