Join us

‘मराठा टायगर्स’ आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

By admin | Updated: February 5, 2016 02:31 IST

बेळगाव सीमाप्रश्न हा महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ज्वलंत प्रश्न आहे. कोणताच राजकीय किंवा सांस्कृतिक कार्यक्रम सीमा प्रश्नाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही.

बेळगाव सीमाप्रश्न हा महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ज्वलंत प्रश्न आहे. कोणताच राजकीय किंवा सांस्कृतिक कार्यक्रम सीमा प्रश्नाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही. यामुळेच कदाचित या प्रश्नाची धार आता बोथट झालीए. ‘काय तुम्ही तेच तेच सीमाप्रश्न उफाळून काढता’ असे लोक फार सहजतेने म्हणताना दिसतात. हीच मराठी माणसाची ‘थंड घेण्याची’ वृत्ती मोडून त्याला आपल्या सीमा भागातील बांधवांचे दु:ख, वेदना, भावना यांची पुन्हा नव्याने जाणीव करून देण्याचा उद्देश आमच्या ‘मराठा टायगर्स’ सिनेमाचा आहे, असे अभिनेता डॉ. अमोल कोल्हे याने ‘लोकमत’ औरंगाबाद कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत म्हणाला. या वेळी दिग्दर्शक अवधूत कदम, अभिनेत्री किरण शरद आणि लेखक/अभिनेता महेश महादेव उपस्थित होते. चित्रपटाच्या टीमशी झालेल्या मनमोकळ्या संवादातून संपूर्ण चित्रपटाचा प्रवास, कर्नाटक सरकारची बंदी आणि सीमाप्रश्नाची दाहकता समोर आली.चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच यश‘मराठा टायगर्स’ पाच फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. परंतु त्याआधीच आमचा सिनेमा यशस्वी झाला आहे, असे अमोल कोल्हे म्हणाला. ते कसे काय? कारण, ‘ज्या पद्धतीने कर्नाटक प्रशासन आमच्या चित्रपटाची मुस्क टदाबी करू पाहतेय, त्यावरून आमच्या कलाकृतीची ताकद लक्षात येईल. कारण मुंगी मारायला कधी तोफ पाठवत नसतात. आपल्या मराठी बांधवांवर सीमा भागात गेली साठ वर्षे जे अत्याचार होत आहेत ते सत्य जगासमोर येईल या भीतीपोटी काही जण धास्तावले आहेत आणि आमचा उद्देशही तोच आहे. लोकांना सीमाप्रश्नाची खरी आणि नव्याने जाणीव करून देण्याचा.दिग्गजांची फौज‘मराठा टायगर्स’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटात विक्रम गोखले आणि आशिष विद्यार्थी यांसारखे दिग्गज कलाकार काम करत आहेत. तब्बल १२ भाषांमध्ये काम केल्यानंतर आशिष विद्यार्थी प्रथमच मराठी चित्रपट दिसणार आहेत. तसेच तेजा देवकरही चांगल्या भूमिकेत आहे. चित्रपटात सहा गाणी असून फुल आॅन अ‍ॅक्शन आहे. मनोरंजनात चित्रपट कुठेही कमी पडणार नाही, अशी संपूर्ण टीमने ग्वाही दिली. त्यामुळे आता हा मराठी टायगर थिएटरमध्ये कसा गर्जना करतो, हे पाहणे रंजक ठरेल.दिग्दर्शकाच्या नजरेतूनसीमा भागातील लोकांचे एक दु:ख आहे, की इतर महाराष्ट्रातील लोकांना बेळगाव किंवा त्या भागात राहणाऱ्यांच्या प्रश्नांची विशेष अशी माहिती किंवा त्याविषयी आस्था नाही. २००८ मध्ये जेव्हा महेशने (महादेव) मला चित्रपटाची कथा ऐकवली तेव्हापासूनच याविषयावर रिसर्च, अभ्यास, माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले. सीमा भागातील लोकांना जाऊन आम्ही भेटलो. त्यांच्या समस्या जवळून पाहिल्या आणि मग सिनेमाची पटकथा आकार घेऊ लागली. त्यामुळे चित्रपटामागे सुमारे आठ वर्षांची मेहनत आहे.