महेश भटच्या कंपनीत तयार झालेला व मोहित सुरीचे दिग्दर्शन असलेला ‘हमारी अधुरी कहानी’ चित्रपट काही प्रेक्षकांना फारसा बघावासा वाटला नाही. विवाहित पुरुष व प्रेमाचा त्रिकोण वापरून ८० च्या दशकातील मसाला २१ व्या शतकातील प्रेक्षकांना दाखवला गेला. जो त्यांच्या गळी उतरला नाही. ३५ कोटी खर्च केलेल्या या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत १६ कोटींचा व्यवसाय केला व सोमवारपासून चित्रपटाचा गल्ला खाली खाली येऊ लागला ही वाईट बाब आहे. शुक्रवारी प्रदर्शनाच्या दिवशीच ‘हमारी अधुरी कहानी’ने ५ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला होता. शनिवारीही या आकड्यात फार सुधारणा झाली नाही. रविवारी गल्ला ६ कोटींचा झाला. ‘हमारी अधुरी कहानी’ अपयशी का ठरत आहे तर चित्रपटगृहातून बाहेर पडणारा प्रेक्षक त्याबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत व त्यामुळे चित्रपट बघायला जाणारे प्रेक्षक आपोआपच रोखले जात आहेत. चित्रपट व्यवसायातील जाणकारांचे म्हणणे असे आहे की, येत्या दिवसांत ‘हमारी अधुरी कहानी’चा गल्ला ३० कोटींच्या जवळपास होऊ शकेल. असे झाले तर त्यातील गुंतवणूकदारांचे नुकसान होणार आहे.मागे प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबद्दल सांगायचे तर झोया अख्तरने दिग्दर्शित केलेल्या ‘दिल धडकने दो’च्या गल्ल्याची गती सलग दुसऱ्या आठवड्यात खूपच मंदावली. दुसऱ्या आठवड्यापर्यंत चित्रपटाने ६६ कोटींची कमाई केली, परंतु त्याचा वेग अजूनही कमीच आहे. १०० कोटींपेक्षा जास्त बजेटच्या चित्रपटांच्या क्लबमध्ये याचा समावेश नसल्यातच जमा आहे. बॉक्स आॅफिसवर यशाचा ढोल वाजविणारा ‘तनू वेड्स मनू रिटर्न’ची स्थिती इतर चित्रपटांच्या तुलनेत चांगली समजली जात आहे. २०१५ मध्ये १०० कोटींचा व्यवसाय करणाऱ्या क्लबमध्ये दाखल झालेल्या ‘तनू वेड्स मनू रिटर्न’बद्दल प्रेक्षकांना सहानुभूती वाटते आहे. या चित्रपटाने आतापर्यंत १४० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. दीपिका पदुकोण व अमिताभ बच्चन यांचा ‘पिकू’ बॉक्स आॅफिसवर स्थिरावला आहे. त्याचा व्यवसाय ८० कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. वाशू भगनानीचा ‘वेलकम टू कराची’ बॉक्स आॅफिसच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे.
महेश भटची कहानी अधुरीच
By admin | Updated: June 16, 2015 01:17 IST