चित्रपट म्हणजे एकीकडे प्रेक्षकांसाठी निखळ मनोरंजन करणारे माध्यम, बॉक्स आॅफीसवर सर्वाधिक गल्ला कोण करतो याची वाढती स्पर्धा, तर दुसरीकडे सामाजिक प्रश्नांचे प्रतिबिंब दाखवणारे न्यू वेव्हमधील चित्रपट आणि त्यांना मिळणारा किरकोळ प्रतिसाद, हे चित्र आहे मागील दोन वर्षांतील काही चित्रपटांचे. कारण एकीकडे मनोरंजन करणारे चित्रपट अवघ्या दोन ते तीन दिवसांत करोडोंचा गल्ला जमवतात, तर दुसरीकडे न्यू वेव्हमधील म्हणजे मनोरंजनापेक्षा सामाजिक प्रश्नांबरोबरच मानसिक विषय उलगडणारे चित्रपट जेमतेम एखादा आठवडाच चित्रपटगृहांमध्ये तग धरू शकतात, ही वस्तुस्थिती आहे सध्याच्या मराठी चित्रपटांची. एक काळ असा होता की विनोदी किंवा सासू-सुनांच्या भांडणाच्या विषयांपर्यंतच मराठी चित्रपट सीमित होता. मात्र कालपरत्वे त्यात बदल होत गेला. सामाजिक विषयांच्या सादरीकरणामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांकडे पाहण्याच्या मनोरंजनात्मक मानसिकतेत काही प्रमाणात परिवर्तन होत गेले आणि चित्रपटांचे मनोरंजन आणि क्लासी असे दोन प्रेक्षकवर्ग तयार झाले. एकीकडे दुनियादारी, डॉ. प्रकाश बाबा आमटे, हॅप्पी जर्नी, एलिझाबेथ एकादशी, येलो, रेगे, पोश्टर बॉईज असे चित्रपट गर्दी खेचत असताना दुसरीकडे या वर्षी प्रदर्शित झालेले मितवा, क्लासमेट्स, कॉफी आणि बरंच काही, लोकमान्य टिळक, देऊळ बंद, डबल सीट या चित्रपटांकडे प्रेक्षक ओढला गेला़ पण तरीही हे प्रमाण इतर चित्रपटांच्या तुलनेत अल्पच आहे. कोर्ट, बायोस्कोप, निळकंठ मास्तर, नुकताच प्रदर्शित झालेला ‘हायवे - एक सेल्फी आरपार’ हे राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घ्यायला भाग पाडलेले, मात्र बॉक्स आॅफीसवर फारसे यश मिळवू शकले नाहीत, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण या चित्रपटांतून दिला जाणारा मेसेज समजणारा क्लास हा आजही अंशत: वेगळाच आहे. कारण चित्रपट ही एक भाषा आहे़ तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळा आहे, हे आता ‘हुशार’ प्रेक्षकांना जाणवू लागले आहे. म्हणूनच बॉक्स आॅफीसवर हिट ठरणाऱ्या चित्रपटांपेक्षा विषयाच्या दर्जेदार मांडणीतून साकार झालेल्या चित्रपटांनाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. म्हणूनच एका विशिष्ट वर्गापुरतेच हे चित्रपट कदाचित मर्यादित राहिल्यामुळे त्याच्या सर्व स्तरांतील प्रेक्षकांपर्यंत जाण्याच्या सीमारेषाही काहीशा पुसटच राहिल्या आहेत.करोडोंचा बिझनेस केला म्हणजेच केवळ चित्रपट हिट ठरला ही समजूत चुकीची आहे. मुळात चित्रपटाचा विषय प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत भिडला पाहिजे, हेच त्यातील खरे गमक आहे. म्हणूनच असे काही चित्रपट म्हणता येतील, जे केवळ मनोरंजन किंवा युवा तरुणाईला आकर्षित करण्यासाठी बनवण्यात आले. उदा. वेलकम जिंदगी, स्लॅमबुक, शॉर्टकट - दिसतो पण नसतो, बाजी, मर्डर मेस्त्री, साटलोटं पण सगळं खोटं, आॅनलाइन बिनलाइन, तुझ्याविना मर जावा अशा चित्रपटांना थंडा प्रतिसादच मिळाला. त्यामुळे आजचा प्रेक्षक हा स्मार्ट तर झालाच आहे; पण चुझीदेखील झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण जे समोर दाखवलं जातयं ते निमूटपणे पाहणारा पूर्वीचा प्रेक्षक आता बदलला असून, विषय चांगला वाटला आणि पटला तरच सुज्ञ प्रेक्षक त्याला आपली पसंती दर्शवतो. त्यामुळे यापुढील काळात चित्रपट मनोरंजनासाठी बनवायचा की क्लासी वर्गासाठी, हे आता ठरवण्याची वेळ नक्कीच आली आहे.एखादा चित्रपट प्रेक्षकांना आवडेलच याबद्दल खात्री नक्कीच नाही देता येत; पण तो चित्रपट प्रेक्षकांना आवडलाच पाहिजे अशी अपेक्षाही नसते. कारण आमच्या डोक्यात जो विषय असतो किंवा जे अनुभव आलेले असतात, ते फक्त शेअर करायचे असतात आणि नवीन काहीतरी सांगायचा प्रयत्न आम्ही करीत असतो. सगळ्याच वर्गासाठी चित्रपट असेलच असे नाही. त्यामुळे चुझी प्रेक्षकच त्याला गर्दी करतो, हेदेखील आम्हाला माहिती आहे.- अविनाश अरुण, दिग्दर्शक
सामाजिक चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ
By admin | Updated: September 23, 2015 00:23 IST