Join us  

कटप्पा पुन्हा वादात, अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

By admin | Published: May 23, 2017 6:07 PM

बाहुबली 2मध्ये कटप्पाची भूमिका साकारणारे अभिनेते सत्यराज हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.

ऑनलाइन लोकमत
तामिळनाडू, दि. 23 -  ‘बाहुबली 2’ म्हणजेच ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर नव्या विक्रमाची नोंद केली. या चित्रपटातून कटप्पानं बाहुबलीला का मारलं, याचं उत्तरही प्रेक्षकांना मिळालं. मात्र तरीही कटप्पाच्या मागचे शुक्लकाष्ट काही संपण्याचं नाव घेत नाही आहेत. बाहुबली 2मध्ये कटप्पाची भूमिका साकारणारे अभिनेते सत्यराज हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. ऊटी न्यायदंडाधिका-यांनी दक्षिणेतले अभिनेते सूर्या, सत्यराज आणि सरथकुमार यांच्याशिवाय अन्य पाच जणांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. सोशल मीडियावर अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्याचं वृत्त पसरताच ट्विटरवर सूर्याच्या बचावासाठी त्यांचे चाहते पुढे आले आहेत. #WeSupportSuriya हे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये आहे. या अभिनेत्यांवर 2009मध्ये मानहानीचा खटला भरण्यात आला होता. एका तमीळ दैनिकाच्या वृत्तानुसार, एक लेख प्रकाशित करण्यात आला होता. त्या लेखात अभिनेते आणि अभिनेत्रीसंदर्भात वेश्या वृत्तीचा केलेला आरोप छापून आला होता. या लेखाला चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकांनी विरोध केला होता. नजीर संगम यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत या अभिनेत्यांनी या लेखावरून मीडियावाल्यांशी असभ्य वर्तन केले होते. त्यानंतर वरिष्ठ पत्रकार रोजारियो मारिया सुसाई यांनी ऊटी न्यायादंडाधिका-यांकडे तक्रार दाखल केली होती. दक्षिणेतल्या या अभिनेत्यांनी मद्रास उच्च न्यायालयात हा खटला रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र त्यांची याचिका फेटाळण्यात आली होती. जेव्हा अभिनेत्यांना 15 मे रोजी कोर्टात हजर राहण्यास सांगितले तेव्हा ते आले नाहीत. त्यामुळेच न्यायदंडाधिका-यांनी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे.