दिया मिर्झाने नुकतीच घोषणा केली की, ती लवकरच दिग्दर्शनाच्या मैदानात पाय ठेवणार आहे. पुढील वर्षी म्हणजे २०१६च्या मध्यापर्यंत तिच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या चित्रपटाची सुरुवात होईल. तिचे म्हणणे आहे की, सध्या चित्रपटाच्या कथेचे काम वेगाने सुरू आहे. चित्रपटाची कास्ट आणि कथेबाबत दिया सध्या गप्प आहे. ती स्वत: आपल्या चित्रपटात काम करणार की नाही, हेही अजून स्पष्ट झालेले नाही. अभिनयात करिअर डोलू लागताच दियाने आपले प्रॉडक्शन हाऊस सुरू केले आणि प्रोड्यूसर म्हणून लव्ह ब्रेकअप्स जिंदगी आणि नंतर विद्या बालनला घेऊन बॉबी जासूस चित्रपट केले. परंतु बॉक्स आॅफिसवर दोन्ही चित्रपट अपयशी ठरले. बॉलीवूडचा इतिहास राहिला आहे की, दिग्दर्शनात खूप जास्त अभिनेत्रींनी नशीब अजमावलेले नाही आणि ज्यांनी हिंमत दाखविली आहे, त्यांनाही जास्त चांगले परिणाम मिळालेले नाही. नर्गिस दत्तची आई जद्दनबाई स्वत: दिग्दर्शक होत्या. ज्यामध्ये पहिला चित्रपट तलाशे-हक होता, ज्यात त्यांनी बाल कलाकार म्हणून नर्गिसला पडद्यावर आणले होते. या चित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी मॅडम फॅशन, हृदय मंथन, मोती का हार आणि जीवन सपना चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. नूतन आणि तनुजा यांची आई शोभना समर्थ यांनीदेखील दिग्दर्शनाच्या मैदानात पाय ठेवला. १९५०मध्ये तयार झालेल्या हमारी बेटीचे दिग्दर्शन त्यांनी केले आणि यामध्ये नूतनला अभिनेत्री म्हणून सादर केले होते. चित्रपटांच्या सुरुवातीच्या काळातील या धुरंधर अभिनेत्रींनंतर जवळजवळ चार दशकांपर्यंत कोणत्याही मोठ्या अभिनेत्रीने दिग्दर्शनाच्या मैदानात येण्याची हिंमत केली नाही. ९०मध्ये हेमा मालिनीने दिल आशना है चित्रपटापासून दिग्दर्शनाची जबाबदारी संभाळली, मात्र यात यश मिळाले नाही. मुलगी ईशा देओलसाठी हेमा मालिनीने टेल मी ओ खुदाचे दिग्दर्शन केले, मात्र येथेही मामला गडबडला. आॅफ बीट चित्रपटांची अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदिता दासनेदेखील दिग्दर्शनात पाय ठेवला आणि २००८मध्ये गुजरात दंगलीवर आधारित फिराकचे दिग्दर्शन केले, मात्र याला बॉक्स आॅफिसवर मोठे यश मिळाले नाही. महेश भट्ट यांची मुलगी पूजाने अभिनयातील निवृत्तीनंतर जिस्म २ पासून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाय ठेवला. दिग्दर्शक म्हणून पूजाला अजूनही पहिल्या हिट चित्रपटाची प्रतीक्षा आहे. बॉलीवूडच्या बाहेर जाऊन पाहिले तर अभिनयातून दिग्दर्शनात आलेल्या अभिनेत्रींमध्ये अपर्णा सेन (कोंकणा सेन-शर्माची आई) आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रेवतीचे नाव पुढे येते. अपर्णा सेन यांनी कोंकणासोबत मि. अॅण्ड मिसेज अय्यर आणि रेवतीने सलमान खान, अभिषेक बच्चन आणि शिल्पा शेट्टीसोबत फिर मिलेंगेचे दिग्दर्शन केले होते. आता सुश्मिता सेन आणि लारा दत्ता व्यतिरिक्त मनीषा कोईरालादेखील दिग्दर्शनाच्या मैदानात पाय ठेवण्याचा विचार करीत असल्याची चर्चा आहे.
- anuj.alankar@lokmat.com