'इंद्रायणी' (Indrayani Serial) या मालिकेत सध्या उत्कंठावर्धक घडामोडी घडत आहेत. एका बाजूला इंदू तिच्या संसारात आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला अधूच्या रुसव्याने तिचं मन अस्थिर झालं आहे. आणि या सगळ्याच्या मध्यावर गोपाळ आणि आनंदीबाईंच्या कुरघोड्या, डावपेच. या दोघांनी लग्नात दिलेले आव्हानं इंदू विसरू शकली नाहीये. लग्न पार पडताच इंद्रायणीने अधोक्षज जवळ तिच्या मनात जे होते ते बोलून दाखवले. गोपाळ आणि तिचे एकमेकांवर प्रेम होते हे अधूला कळताच त्याला खूप मोठा धक्का बसला आणि त्या दिवसापासून अधू इंदूवर नाराज आहे.
आता इंदू आणि अधू देवदर्शनासाठी चांदवड येथे रेणुका आईच्या दर्शनासाठी निघाले आणि तिथे इंदूने अधू आणि तिच्यातील दुरावा कायमचा मिटावा म्हणून देवीला साकडं घातले. पण, अधूला ज्या गोष्टीची भीती होती तेच घडणार आहे. गोपाळ आणि इंदूच्या नात्याचे सत्य आनंदीबाईं समोर येणार आणि त्या इंदूला चारित्र्यहीन असं म्हणताना दिसणार आहेत ज्यावर अधू आनंदीबाईंना खडसावून सांगणार आहे की, "माझ्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घेतलेला मला चालणार नाही".
या देवदर्शनाच्या निमित्ताने देवीच्या चरणी जाऊन इंदू एकच मागणी करते, ''अधूचं माझ्यावरचं प्रेम पुन्हा मिळविण्याची ताकद मला दे.'' सुनेच्या रूपात इंदू घरात आली खरी, पण पत्नी म्हणून अधू तिला स्वीकारेल का? हा प्रश्न तिला सतावत आहे. इंदू देवीला साकडं घालते तिच्या नजरेतील प्रेम अधूपर्यंत पोहचू दे. या सगळ्यात एक धक्कादायक वळण म्हणजे इंदू आणि अधूवर जीवघेणा हल्ला होणार आहे. या संकटाला दोघेही सामोरे जातात आणि सुखरूप बाहेर पडतात. पण, एकीकडे अधूचा रुसवा तर दुसरीकडे आनंदीबाई, नव्या संसारात येणारं दुहेरी आव्हान कसं पेलणार इंदू? अधूचं प्रेम परत मिळवण्यासाठी इंदू कोणते प्रयत्न करणार? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.