Join us  

Dhanush-Aishwarya Separation: रजनीकांतच्या दुसऱ्या मुलीचाही घटस्फोट होणार; धनुष-ऐश्वर्याची वेगळे होण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 8:17 AM

Dhanush-Aishwarya divorce: रजनीकांतची मोठी मुलगी सौदर्या हिचाही २०१६ मध्ये घटस्फोट झाला होता. यानंतर तिने २०१९ मध्ये दुसरे लग्न केले होते. आता रजनीकांतची दुसरी मुलगी ऐश्वर्या ही तिच्या पतीपासून वेगळी होणार आहे.

साऊथचा मराठमोळा सुपरस्टार रजनीकांतची दुसरी मुलगी ऐश्वर्या आणि अभिनेता धनुष यांनी काल रात्री मोठी घोषणा केली आहे. धनुष आणि ऐश्वर्याने १८ वर्षांचे नाते संपविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.

रजनीकांतची मोठी मुलगी सौदर्या हिचाही २०१६ मध्ये घटस्फोट झाला होता. यानंतर तिने २०१९ मध्ये दुसरे लग्न केले होते. आता रजनीकांतची दुसरी मुलगी ऐश्वर्या ही तिच्या पतीपासून वेगळी होणार आहे. धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहून याची माहिती दिली आहे. 

''मैत्रिणीच्या रुपात, जोडप्याच्या रुपात, आई-वडिलांच्या रुपात आणि एकमेकांच्या हितचिंतकाच्या रुपात आम्ही १८ वर्षे एकत्र राहिलो. हा प्रवास खूप चांगला होता. आज आम्ही अशा जागी येऊन उभे ठाकलो आहोत, जिथे दोघांचेही रस्ते वेगळे झालेले आहेत. ऐश्वर्या आणि मी एक जोडपे म्हणून वेगळे होण्याचा आणि स्वत:च्या चांगल्यासाठी व्यक्तीगतरित्या समजण्यासाठी वेळ काढण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या निर्णयाचे स्वागत करा, यातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला आमचा खासगीपणा द्या, अशा शब्दांत दोघांनीही पोस्ट केली आहे. तसेच चाहत्यांना तसे आवाहन करताना धनुषने हात जोडण्याची इमोजी देखील पोस्ट केली आहे.

धनुषने 18 नोव्हेंबर 2004 रोजी अभिनेता रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिच्याशी मोठ्या थाटामाटात लग्न केले. धनुषचे लग्न झाले तेव्हा तो फक्त 23 वर्षांचा होता. दोघांची पहिली भेट 2003 मध्ये एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. धनुष आणि ऐश्वर्याला यत्र आणि लिंगा नावाची दोन मुले आहेत.

अशी झाली होती ओळख....धनुषने एका मुलाखतीत ऐश्वर्यासोबतच्या पहिल्या भेटीचा उल्लेख केला होता. तो म्हणाला होता, माझा चित्रपट काढाल कोंडेचा पहिला शो होता. मी संपूर्ण कुटुंबासह चित्रपट पाहायला गेलो होतो. चित्रपट संपल्यावर, सिनेमा मालकाने आमची ओळख रजनीकांत सरांच्या मुली ऐश्वर्या आणि सौंदर्या यांच्याशी करून दिली. आम्ही फक्त एकमेकांना नमस्कार केला आणि निघालो. दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याने मला पुष्पगुच्छ पाठवला आणि म्हणाली, चांगले काम केलेस. संपर्कात राहा. मी ती गोष्ट खूप गांभीर्याने घेतली. 

टॅग्स :धनुष