Join us

दुबळ्या कथानकावर नृत्याविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2015 22:55 IST

बॉलीवूडमध्ये नृत्यावर आधारित चित्रपट बनविण्याची जोखीम घेण्यास फारसे कोणी धजत नाही, असे असले तरी ‘एनी बडी कॅन डान्स’ या चित्रपटाला मिळालेले यश पाहून निर्माते चकित झाले.

- अनुज अलंकार

एबीसीडी-२ (चित्रपट)बॉलीवूडमध्ये नृत्यावर आधारित चित्रपट बनविण्याची जोखीम घेण्यास फारसे कोणी धजत नाही, असे असले तरी ‘एनी बडी कॅन डान्स’ या चित्रपटाला मिळालेले यश पाहून निर्माते चकित झाले. या यशामुळे दिग्दर्शक रेमो डिसुझा यांनी याच चित्रपटाचा दुसरा भाग बनिवण्याचा धाडसी निर्णय घेतला. या दोन्ही चित्रपटांमधील मूळ फरक एवढाच की, पहिल्या चित्रपटात बहुतांश नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली.या वेळी मात्र वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांना घेऊन मोठी जोखीम पत्करण्यात आली. सुरेश (वरुण धवन) आणि विनी (श्रद्धा कपूर) यांच्याभोवती कथानक फिरते. दोघेही एका नृत्यकला गटाशी संबंधित असतात. हा गट फिलिपीन्सच्या डान्स ग्रुपची नकल करीत असल्याचा ठपका ठेवून या गु्रपला स्पर्धेतून बाद करण्यात येते. या अपमानाने या ग्रुपचे सर्व सदस्य खचतात. तथापि, सुरेश मात्र न खचता लास वेगास येथील नृत्य स्पर्धेत सहभागी होणाच्या जिद्दीने तयारीला लागतो. या स्पर्धेत विजयी होऊन ग्रुपला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याचा चंग बांधतो. दरम्यान, सुरेशची भेट विष्णूशी (प्रभुदेवा) होते. विष्णूने मार्गदर्शन केले तर आपला ग्रुप निश्चित ही स्पर्धा जिंकू शकतो, या विश्वासाने सुरेश विष्णूला राजी करतो. विष्णूच्या प्रयत्नांमुळे सुरेशच्या ग्रुपला लास वेगासच्या स्पर्धेत प्रवेश मिळतो. लास वेगास येथे पोहोचल्यानंतर मात्र कथानकाला वेगळे वळण लागते. विशेषत: सुरेश आणि विष्णू यांच्या भूमिकेने कथेला नवा साज लाभतो. सरतेशेवटी सुरेश आणि त्याचा ग्रुप ही स्पर्धा जिंकून आपल्या ग्रुपला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यात यशस्वी होतो.

उणिवा -

या चित्रपटातही पहिल्या चित्रपटाप्रमाणेच उणिवांची जंत्री आहे. डान्स ग्रुपला वास्तवापासून दूर ठेवण्यात आले आहे. बऱ्याच वेळा शाहरूख खानच्या ‘हॅपी न्यू ईअर’ची आठवण होते. कथानकापेक्षाही डान्सच्या नावावर युवकांना भुरळ घालण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. पूर्वार्धात गतिशील असलेला चित्रपट उत्तरार्धात मात्र गतिमान होणे न्यायसंगत वाटत नाही.वैशिष्ट्ये - वरुण धवनचे काम आणि नृत्य भन्नाट आहे. नृत्याच्या बाबतीत वरुणने हृतिक रोशन आणि शाहीद कपूरच्या पंक्तीत स्थान मिळविले आहे. त्याचे हे मोठे यश आहे. श्रद्धा कपूरला मात्र फारसा वाव मिळालेला नाही. प्रभुदेवा या वेळीही खास शैलीने चाहत्यांच्या पसंतीला उतरला आहे. दिग्दर्शक रेमो डिसुझा यांची छाप मात्र दिसत नाही. एकूणच हा चित्रपट महानगरातील तरुणाईसाठीच बनविला असल्याचे जाणवते.