एक काळ असा होता, की बॉलिवूडमध्ये नायकाशिवाय सिनेमाची निर्मिती, अशी कल्पनादेखील केली जात नव्हती. मात्र, अलीकडच्या काळात हा ट्रेंड पूर्णत: बदलला असून, नायिकाप्रधान सिनेमे बॉक्स आॅफिसवर धूम उडवून देत आहेत. कारण वर्षात प्रदर्शित होणारे निम्मे सिनेमे असे असतात, ज्यांची पूर्ण मदार ही त्या सिनेमातील नायिकेवर असते. अर्थात, हे सर्व त्या नायिकेच्या बॉलिवूडमधील कर्तृत्वावर अवलंबून असते. अशाच काही बॉलिवूडमधील पॉवरफुल वुमन्सविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांनी आपल्या कर्तृत्वावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले आहे.प्रियांका चोप्रा२००० या वर्षात मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी अभिनेत्री प्रियंका चोपडा हिने केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे, तर हॉलिवूडमध्येही स्वत:चे वलय निर्माण केले आहे. अमेरिकी टीव्ही शो ‘क्वांटिको’मधून तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध करताना जगराभरात प्रसिद्धी मिळवली आहे. आता तिचा ‘बेवॉच’ हा पहिलावहिला हॉलिवूडपट रिलीज होणार असून, त्यामध्ये प्रियंका एका महत्त्वपूर्ण भूमिकेत बघायला मिळेल. तिच्या हॉलिवूड प्रवासाविषयी बोलताना प्रियंकाने म्हटले होते, की मीच नव्हे तर माझे इतरही भारतीय सहकारी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर स्वत:ला सिद्ध करीत आहेत. त्यामुळे भारतीय त्यांच्यातील प्रतिभा जगाला दाखविण्यात यशस्वी होत आहेत. तिच्या बॉलिवूड प्रवासाविषयी जर विचार केला, तर सद्य:स्थितीत प्रियंकाचे स्थान टॉपच्या अभिनेत्रींमध्ये आहे.कंगना रणौतकंगना राणावत हिला बॉलिवूडची दबंग अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. कारण ती कोणासोबतही पंगा घेण्यास कधीच मागे सरत नाही. बॉलिवूडमध्ये राहून तिने घराणेशाहीला तर विरोध केलाच; शिवाय खान त्रिकुटासोबत काम करण्यासही सपशेल नकार दिला. नुकत्याच रिलीज झालेल्या तिच्या ‘रंगून’ या सिनेमात तिने निर्मात्यांसमोर मेल स्टारपेक्षा अधिक मानधन घेणार असल्याची अट ठेवली होती. ती बिनशर्त मान्य केली गेली. कंगनाने बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करताना नायकांची असलेली मक्तेदारीच एक प्रकारे मोडून काढली. स्वत:च्या हिमतीवर तिने अनेक नायिकाप्रधान सिनेमांमध्ये स्वत:ला दबदबा निर्माण केला. त्यामुळेच ‘तडजोड’ हा शब्द कंगनाच्या डिक्शनरीतून सध्या तरी गायब आहे.
अनुष्का शर्मा २००८मध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुखसोबत बॉलिवूड करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्वत:चे प्रबळ स्थान निर्माण केले आहे. अनुष्काने बॉलिवूडमधील तिन्ही खानसोबत काम करताना निर्मिती क्षेत्रातही स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे. तिच्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत आतापर्यंत ‘एनएच - १०’ व ‘फिलौरी’ या सिनेमांची निर्मिती करण्यात आली आहे. यातील ‘एनएच-१०’ या सिनेमाने बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमविला, तर ‘फिलौरी’ हा सिनेमाही लवकरच रिलीज होणार असून, प्रदर्शनापूर्वीच तो चर्चेत आहे. सद्य:स्थितीत अनुष्काकडे बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री म्हणून बघितले जाते.
दीपिका पदुकोणअनुष्काप्रमाणेच दीपिकानेही शाहरुखसोबतच ‘ओम शांती ओम’ या सिनेमातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. या सिनेमाने दीपिकाला रातोरात स्टार बनविले होते. त्यानंतर मात्र दीपिकाने कधीच मागे वळून पाहिले नाही. एकापाठोपाठ एक सुपरहिट सिनेमे दिल्याने तिने काही काळातच बॉलिवूडमध्ये दबदबा निर्माण केला. पुढे तिने हॉलिवूडमध्येही स्वत:ला सिद्ध केले. विन डिझेलसारख्या सुपरस्टारसोबत ती ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’ या सिनेमात झळकली. या सिनेमाने जगभरात कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडले.
जोया अख्तरप्रसिद्ध संगीतकार जावेद अख्तर यांचा मुलगा फरहान अख्तर हा बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेता तथा दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो; परंतु त्यांची मुलगी जोया हीदेखील मागे राहिली नाही. ‘लक बाय चान्स’, ‘जिंदगी न मिलेगी दोबारा’ आणि ‘दिल धडकने दो’ यासारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये तिने महिला सशक्तीकरणाचा विषय मांडून या चळवळीला एक प्रकारची बळकटी दिली. जोया नेहमीच तिच्या सिनेमात महिलांच्या सशक्त भूमिका मांडण्यासाठी ओळखली जाते.
एकता कपूर‘टीव्ही क्वीन’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या एकता कपूरने छोट्या पडद्यावर स्वत:चे निर्विवाद वर्चस्व कायम ठेवलेले आहे. शिवाय तिने अनेक सिनेमांचेही दिग्दर्शन केले आहे. सासू-सुनेवर आधारित मालिकांची निर्मिती करण्यात एकताचा हातखंडा आहे. आजही तिच्या विषयांवरील मालिका छोट्या पडद्यावर धूम उडवून देत आहेत.
अनविता दत्त गुप्तनकॅमेऱ्यासमोर भूमिका साकारताना बऱ्याच अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये दबदबा निर्माण केला आहे. मात्र, या सर्व प्रक्रियेच्या बाहेर राहून आपल्या लेखणीतून अनविता यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. गीतकार, स्क्रिप्ट रायटर, डायलॉग रायटर या क्षेत्रात त्यांनी ठसा उमटविला आहे. बॉलिवूडमधील अनेक दमदार कथा त्यांच्या नावावर आहेत.
स्नेहा खनवलकरमहिला संगीतकार हे नाव बॉलिवूडच्या इतिहासात शोधूनही मिळत नव्हते; मात्र म्युझिक डायरेक्टर स्नेहा खनवलकर यांनी बॉलिवूडमधील ही कमतरताही भरून काढली. एका टीव्हीच्या ‘म्युझिक ट्रिपिंग’चे गाणे ‘टुंग टुंग’मधून चर्चेत आलेल्या स्नेहाने आज इंडस्ट्रीमध्ये स्वत:चा ठसा उमटविला आहे. ‘गँग्स आॅफ वासेपूर’मध्ये तिने दिलेल्या संगीतामुळे आज स्नेहाला डीमांड वाढली आहे.