बॉलिवूडचा भाईजान सलमान खान लग्न कधी करणार याची चाहते वाट बघत आहेत. खरं तर सलमानचं लग्न ठरलं होतं. पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. मात्र, अभिनेत्याचं हे लग्न मोडलं. त्यानंतर सलमानच्या आयुष्यात पुन्हा बोहल्यावर चढण्याचा योग आलाच नाही. पण, लग्नाबद्दल सलमान खानने एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. त्यासोबतच त्याने वडील सलीम खान यांच्या मॅरेज लाइफबाबतही सांगितलं होतं.
सलमानने लग्नाला विनोदी गोष्ट म्हटलं होतं. "मला वाटतं लग्न एक विनोद आहे. 'बीवी नंबर १' आणि 'मुझसे शादी करोगी' या सिनेमांमधून पण हेच दाखवलं गेलं आहे. इथे विनोदाला खूप जास्त वाव आहे. कपल्समध्ये जी भांडणं होतात तेदेखील हास्यास्पद असतं. म्हणजे तुझी आई मला असं कसं बोलली? जेवणावरुन काय बोलली? इथे सासू सूनांच्या गोष्टी असतात आणि एकता कपूर यावर मालिका बनवून पैसे कमावते. मी असेही कपल्स पाहिले आहेत जे त्यांच्या लग्नामुळे खूश नाहीत. ते जसं दाखवतात तसं नसतं", असं सलमान म्हणाला होता.
सलमानने त्याच्या वडीलांच्या सलीम खान यांच्या दोन लग्नांची खिल्लीही उडवली होती. "माझे वडील सलीम एकटेच अशी व्यक्ती असतील जे लग्न करून खूश आहेत. माझे वडील खूश आहेत कारण त्यांच्या दोन पत्नी आहेत. त्या दोघींचंही एकमेकींशी चांगलं पटतं", असं तो म्हणाला होता. सलीम खान यांनी १९६४ साली सुशीला चरक यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. त्यांना अरबाज, सोहेल आणि सलमान ही तीन मुले आहेत. तर सलीम यांनी १९८१ मध्ये हेलन यांच्याशी दुसरा विवाह केला होता.