विनोद खन्ना यांना नेहमीच अभिनयसृष्टीत कारकिर्द करायची होती. पण त्यांनी त्यांच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळावा असे त्यांच्या वडिलांचे म्हणणे होते. विनोद यांना न सांगताच त्यांनी त्यांचे अॅडमिशन सिडनम कॉलेजमध्ये घेतले होते. विनोद यांनी अभिनयापासून दूर राहावे यासाठी त्यांच्या वडिलांनी अनेक प्रयत्न केले. त्यांचे वडील खूप कडक होते. पार्टींना किंवा मित्रांसोबत बाहेर फिरायला जायला ते त्यांना परवानगी देत नसत. पण विनोद प्रचंड हट्टी होते. सुरुवातीला विनोद कॉलेजला जायलाच तयार नव्हते. पण तिथे गेल्यावर तिथल्या वातावरणात ते रमले. तसेच कॉलेजमघ्ये गेल्यावर त्यांनी नाटकात काम करायला सुरुवात केली. आपल्या कॉलेजच्या आयुष्याविषयी त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, मी कॉलेजमध्ये अनेक नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर तिथे अनेक प्रेयसी बनवल्या. मुलींच्या घोळक्यातच मी असायचो. त्याचदरम्यान माझी गितांजलीशी ओळख झाली. आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलो. कॉलेजमध्ये असताना एका पार्टीत मला सुनील दत्त यांना भेटायची संधी मिळाली. त्यांनी मला त्याच पार्टीत पहिल्या चित्रपटाची ऑफर दिली. पण चित्रपटात काम करण्यास माझ्या वडिलांचा विरोध होता. त्यांनी माझ्या डोक्यावर अक्षरशः बंदूक धरली होती. पण माझ्या आईने त्यांना समजावले आणि मला चित्रपटसृष्टीत येण्याची संधी मिळाली.
Also Read : बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याचेदेखील याच दिवशी झाले होते निधन
विनोद खन्ना यांच्या व्यवसायिक आयुष्यासोबत त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील चांगलेच गाजले. त्यांच्या गितांजली आणि कविता अशा दोन पत्नी होत्या. कॉलेजमध्ये असतानाच ते गितांजलीच्या प्रेमात पडले होते. चित्रपटसृष्टीत मिळालेल्या यशानंतर त्यांनी आणि गितांजली यांनी लग्न केले. लग्नानंतर एकाच वर्षांत राहुल त्यांच्या आयुष्यात आला आणि त्यानंतर अक्षय. ते चित्रपटाच्या चित्रीकरणात कितीही व्यग्र असले तरीही रविवारी काम करत नसत. काही काळानंतर विनोद खन्ना अध्यात्माकडे वळले. ओशो राजनीश यांनी सांगितलेल्या मार्गावर त्यांचे जीवन सुरू होते. राजनीश यांचा शिष्य बनून राहायचे असल्याने त्यांनी यूएसला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. भारतापासून ते दूर असल्याने गितांजलीसोबत त्यांचे वाद होत असत. त्यातूनच त्यांचा १९८५ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या आयुष्यात उद्योगपती लालचंद हिराचंद यांची नात कविता दफ्तरी या आल्या. त्या दोघांमध्ये प्रेम फुलू लागले आणि १९९० मध्ये त्यांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. साक्षी आणि श्रद्धा अशी त्यांना दोन मुले आहेत.
Also Read : विनोद खन्ना यांची प्रसिद्ध गाणी
विनोद खन्ना यांचे प्रेमप्रकरण अमृता सिंगसोबतही गाजले होते. अमृता सिंग आणि विनोद खन्ना जे.पी.दत्ता यांच्या बटवारा या चित्रपटात काम करत असताना अमृता विनोद यांच्या प्रेमात पडली. खरे तर त्यावेळी तिचे अफेअर क्रिकेटर रवी शास्त्रीसोबत सुरू होते. पण रवीला चिडवण्यासाठी ती विनोद खन्ना यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असे. पण सुरुवातीच्या काळात विनोद यांनी अमृताकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. विनोद अमृताला भाव देत नाही हे पाहिल्यावर रवी शास्त्री यावरून अमृताची खिल्लीदेखील उडवत असत. ही द्राक्षे खूपच आंबट आहेत असे अमृताला ते म्हणत असत. पण अमृता ही स्वभावाने खूप हट्टी होती. त्यामुळे काहीही झाले तरी विनोद यांचे मन जिंकायचे असे तिने ठरवले आणि तिने त्यांच्यासोबत खूप चांगली मैत्री केली. विनोददेखील काही काळानंतर अमृतावर फिदा झाले. त्यांची प्रेमकथा त्यावेळी मीडियात चांगलीच गाजली होती. अमृता आणि विनोद यांच्यामध्ये अनेक वर्षांचे अंतर होते. अमृताच्या आईला विनोद आणि अमृता यांच्या नात्याबद्दल कळल्यानंतर त्यांनी यासाठी विरोध केला. विनोद हे जवळजवळ तिच्या आईच्या वयाचे होते आणि त्यांचे लग्न झाले असून त्यांना दोन मुलेदेखील होती. अमृताच्या आईच्या हे लक्षात आल्यावर तिने आपल्या मुलीला विनोद यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. विनोद हे देखील नात्याबद्दल तितकेसे गंभीर नसल्याने त्यांनी अमृतासोबत ब्रेकअप केले.