बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई करण जोहरच्या मॅनेजरची चौकशी करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल दिली आणि यानंतर कंगना राणौत भडकली. मुंबई सुशांतच्या हत्याकांडाची चेष्टा करणे बंद करा, असे तिने मुंबई पोलिसांना सुनावले. करणऐवजी त्याच्या मॅनेजरशी चौकशी करून काय हशील होणार आहे? असा संतप्त सवालही तिने केला. कंगनाच्या वतीने तिच्या टीमने एकापाठोपाठ एक अशी अनेक ट्वीट्स केलीत.
‘करण जोहरच्या मॅनेजरला समन्स पाठवण्यात आला आहे. मात्र आदित्य ठाकरे यांचा बेस्ट फ्रेंड करण जोहरला नाही. मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतच्या हत्याकांडाच्या तपासाची चेष्टा करणे बंद करावे,’ असे ट्वीट कंगनाच्या टीमने केले.
‘समन्स जारी करतानाही मुंबई पोलीस इतका निर्लज्जपणा व दुजाभाव कसा दाखवू शकतात? कंगनाला समन्स पाठवण्यात आला आहे तिच्या मॅनेजरला नाही. मात्र मुख्यमंत्र्यांचा मुलाच्या बेस्ट फ्रेन्डच्या मॅनेजरला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. का? साहेबांना त्रास होऊ नये म्हणून?, असे कंगनाने दुस-या ट्वीटमध्ये म्हटले.
सुशांतने गेल्या 14 जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनी 37 जणांची चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवला आहे. आता कंगना राणौत, दिग्दशृक महेश भटयांनाही आपला जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवण्यात आला आहे. तर करण जोहरच्या मॅनेजरलाही कॉल करण्यात आला आहे. गरज पडली तर करण जोहरलाही कॉल केला जाईल, असे काल अनिल देशमुख यांनी सांगितले होते.